अपेक्षेपेक्षा जादा पाऊस, पण पिके कोमात, धरणे तहानलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:39 IST2021-08-18T04:39:54+5:302021-08-18T04:39:54+5:30

बीड : तब्बल महिनाभरापासून इंद्रदेव रुसल्याने खरिपाची पिके तर काही ठिकाणी पेरण्या संकटात सापडल्या आहेत. विशेष म्हणजे जून ते ...

More rain than expected, but crops in coma, dams thirsty | अपेक्षेपेक्षा जादा पाऊस, पण पिके कोमात, धरणे तहानलेलीच

अपेक्षेपेक्षा जादा पाऊस, पण पिके कोमात, धरणे तहानलेलीच

बीड : तब्बल महिनाभरापासून इंद्रदेव रुसल्याने खरिपाची पिके तर काही ठिकाणी पेरण्या संकटात सापडल्या आहेत. विशेष म्हणजे जून ते १७ ऑगस्ट दरम्यान अपेक्षित साधारण पावसाच्या तुलनेत जादा पाऊस झाला आहे. तरीही धरणांमध्ये पाणीसाठा पन्नास टक्क्यांपर्यंतच आहे. तर खरीप पिकांची अवस्था बिकट झाली आहे.

यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे; मात्र पावसाअभावी सोयाबीनसह इतर पिकेही सुकण्याच्या परिस्थितीत आहेत. काही ठिकाणी तर पिके पिवळी पडून कोमेजून गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. बीड खरिपाचे सर्वधारण क्षेत्र ७ लाख ४६ हजार ४८ हेक्टर असून, ७ लाख ४० हजार ७७१ हेक्टरात यंदा पेरा झाला आहे. हे प्रमाण ९९.२९ टक्के इतके आहे. जूनमध्ये दमदार हजेरी लावणारा पाऊस जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत गायब झाल्याने शेतकरी आभाळाकडे डोळे लावून आहेत. जिल्ह्यात कपाशीचे क्षेत्र ३ लाख ५७ हजार ५५३ असून, ७० टक्के पेरण्या झाल्या आहेत. तर सोयाबीनचे क्षेत्र १ लाख ९० हजार ७४८ हेक्टर असून, १४९ टक्के पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे लांबलेल्या पावसाचा सर्वाधिक फटका सोयाबीन व त्यापाठोपाठ कापसाला बसणार आहे.

१) आतापर्यंत अपेक्षित पाऊस - ३३१.८ मिमी. प्रत्यक्ष झालेला पाऊस - ४२१.१

२) पेरणी वाया जाण्याची शक्यता (खरीप पिकांचा आढावा. हेक्टर्समध्ये)

कापूस - २,५१,१५६

सोयाबीन -२,८४,९७४

उडीद -४४,८४२

मूग -२१,२९९

तूर - ७१,९११

३) पाणीसाठा ४५ टक्क्यांवर

लघू - २८

मध्यम - ५०

मोठे - २९

४) उसनवारी कशी फेडणार?

आष्टी तालुक्यातील धानोरा मंडळात यावर्षी सर्वात कमी पाऊस नोंदला गेला आहे. पावसाने ओढ दिल्याने पिके ७५ टक्के वाया गेली आहेत. त्यामुळे नुकसान होणार असून, खरिपासाठी केलेला खर्च कसा भरून काढायचा? -- संजय चव्हाण, शेतकरी, हिवरा, ता. आष्टी.

-------------

सोयाबीनला वेळोवेळी पाऊस राहिला तर पीक अतिशय जोमात येते; पण तीन आठवड्यांपासून पाऊस नसल्याने जोमात आलेले सोयाबीन उन्हामुळे कोमेजत आहेत. उसनवारी करून शेतीसाठी खर्च केला; पण आता फेडायची कशी, याची चिंता आहे. - धोंडीराम राठोड, लवूळ, ता. माजलगाव.

-----

यंदा सोयाबीनचे पीक जोमात आहे. पावसाअभावी पिकाला धोका निर्माण झाला आहे. हलक्‍या जमिनीतील सोयाबीन सुकत आहे. काळ्या जमिनीतील सोयाबीन मात्र तग धरून आहे. --- सिद्धेश्वर हजारे, कृषी अधिकारी, पंचायत समिती, माजलगाव.

---------

Web Title: More rain than expected, but crops in coma, dams thirsty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.