भीक्षेकऱ्याचे गायब झालेले पावणेदोन लाख रुपये मिळाले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:33 IST2021-05-26T04:33:32+5:302021-05-26T04:33:32+5:30
याबाबतची माहिती अशी की, येथील वैद्यनाथ मंदिर परिसरात गेल्या काही वर्षांपासून बाबूराव नाईकवाडे (वय ८०, रा. रामनगर तांडा) ...

भीक्षेकऱ्याचे गायब झालेले पावणेदोन लाख रुपये मिळाले परत
याबाबतची माहिती अशी की, येथील वैद्यनाथ मंदिर परिसरात गेल्या काही वर्षांपासून बाबूराव नाईकवाडे (वय ८०, रा. रामनगर तांडा) हे भाविकांकडून भीक्षा मागत असतात. त्यांना दोन मुले, सुना, एक मुलगी असा परिवार आहे. मुले वीटभट्टीवर कामास आहेत. मंगळवारी सकाळी ८ वाजता त्यांनी शहर पोलीस ठाणे येथे येऊन आपली पैशाची पिशवी गायब असल्याची तक्रार रडत केली होती. पोलिसांनी नाईकवाडे यांना सोबत नेऊन, ते कुठे बसत होते, कुठे झोपत होते, कुठे राहत होते, याची पाहणी केली. वैद्यनाथ मंदिराजवळील रामनगर तांडा येथे छोट्याशा खोलीत ते राहतात. त्या ठिकाणी जाऊन शोध घेतला असता, काही किलोमीटर अंतरावर एक पिशवी आढळून आली. त्यातील पैसे मोजले असता, एक लाख ७२ हजार रुपये असल्याचे आढळून आले. त्यामध्ये दोन हजार, पाचशे, शंभर, पन्नास व दहा रुपयांच्या नोटा होत्या. ही सर्व रक्कम नाईकवाडे यांना सहायक पोलीस निरीक्षक पालवे यांच्याहस्ते सुपूर्द करण्यात आली.
परळी शहरचे सहायक पोलीस निरीक्षक जे. बी. पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे पोलीस जमादार भास्कर केंद्रे, शंकर बुट्टे, गोविंद भताने यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
बाबूराव नाईकवाडे हे गेल्या काही वर्षांपासून वैद्यनाथ मंदिर परिसरात भीक्षा मागून आपला उदरनिर्वाह चालवतात. अंगात रग असेपर्यंत त्यांनी काही वर्षे मजुरीचे काम केले. जसजसे वय वाढत गेले, तसे काम जमत नसल्याने त्यांनी मंदिर परिसरातच भीक्षा मागण्यास सुरू केले. अनेक वर्षांपासून जमा केलेले पैसे ते पिशवीत ठेवत आणि ती पिशवी स्वतःजवळच ठेवून झोपत होते. सोमवारी रात्री झोपल्यानंतर पैशाची पिशवी हरवल्याने ते मंगळवारी पहाटे अस्वस्थ झाले व रडतच सकाळी पोलीस ठाण्यात आले होते. त्यांची पैशाची पिशवी कशी गायब झाली, याचे कोडे मात्र कायम आहे.
===Photopath===
250521\img-20210525-wa0288_14.jpg