परिपूर्ण आरक्षण मराठा समाजाला मिळाले पाहिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:23 IST2021-06-03T04:23:56+5:302021-06-03T04:23:56+5:30
बीड : मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन फडणवीस सरकारने गायकवाड आयोग नेमून मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध केले होते. ...

परिपूर्ण आरक्षण मराठा समाजाला मिळाले पाहिजे
बीड : मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन फडणवीस सरकारने गायकवाड आयोग नेमून मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध केले होते. सर्वोच्च न्यायालयात गायकवाड आयोगाच्या अहवालातील परिशिष्ट आणि जोडपत्रांचे इंग्रजीत भाषांतर करून सर्वोच्च न्यायालयात सादर केले नाही, त्यामुळे कोर्टासमोर हा अहवाल परिपूर्ण नसल्याचे सिद्ध झाले. राज्य सरकारची ही हलगर्जी नडली. मराठा आरक्षणाचा प्रश्न आघाडी सरकारने गांभीर्याने हाताळला नाही. मराठा आरक्षण रद्द झाले. आजपर्यंतचा मराठा आरक्षणाचा लढा समाजानेच यशस्वी केला. यापुढेही मराठा आरक्षणाचा लढा चालूच राहील. ठोस, कायम आणि परिपूर्ण आरक्षण देण्यासाठी भारतीय जनता पार्टी समाजाबरोबर उभी राहील. मराठा समाजाच्या आक्रोशाला पूर्ण साथ देणार, असे आश्वासन भारतीय जनता पार्टीचे नेते आ.आशिष शेलार यांनी दिले.
२ जून रोजी बीड येथे भारतीय जनता पार्टीच्यावतीने जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी मराठा आरक्षणसंदर्भात मराठा आरक्षण लढ्यातील निवडक कार्यकर्ते व समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींची संवाद बैठक आयोजित केली होती. या बैठकी दरम्यान अनेक मराठा कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करून मराठा आरक्षण कोणत्याही परिस्थितीत मिळालेच पाहिजे, अशी मागणी यावेळी केली.
आ. शेलार म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही भारतीय जनता पार्टीची प्रबळ इच्छा आहे. कोरोना परिस्थितीत रस्त्यावर न उतरता संवादाच्या माध्यमातूनसुद्धा लढा यशस्वी होण्यास निश्चित मदत होऊ शकते. मराठा आरक्षण कायद्याने यशस्वी होण्यासाठी समाजाने टिपण दिल्यास तिचा स्वीकार आणि अंमलबजावणी आम्ही निश्चित करू.
आजपर्यंत कालेलकर, बापट, खरे आणि मंडल असे आयोग येऊन गेले; परंतु कोणत्याही आयोगाने मराठा समाज मागास आहे, हे निर्देशित केले नाही. समाज मागास असल्याची बाब समोर आणली नाही. भाजपा सरकारने गायकवाड आयोगामार्फत मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध करून मराठा आरक्षणाचा पाया रचला; परंतु ज्यांना मराठा आरक्षणाबाबत आकस आहे, तेच आज सत्तेत असल्यामुळे मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकवू शकले नाहीत, असा आरोप आ. शेलार यांनी केला.
मराठा आरक्षण संवाद बैठकीला आ.लक्ष्मण पवार, आ.नमिता मुंदडा, सलीम जहांगिर, स्वप्निल गलधर, जगदीश गुरुखुदे, प्रा.नागरगोजे, संगीता धसे, भाजपा पदाधिकारी यांच्यासह बीडमधील विविध मराठा संघटनांचे पदाधिकारी महेश धांडे, शैलेश जाधव, विठ्ठल बहिर, गणेश बजगुडे, विजय लव्हाळे, सचिन उबाळे, संतोष जाधव, भागवत मस्के आदि उपस्थित होते.
===Photopath===
020621\02bed_13_02062021_14.jpg
===Caption===
आशिष शेलार