मलकापूर, कन्हेरवाडी ग्रामस्थांनी अडविल्या राखेच्या हायवा गाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:22 IST2021-07-03T04:22:00+5:302021-07-03T04:22:00+5:30
परळी : तालुक्यातील मलकापूर व कन्हेररवाडी येथील ग्रामस्थांनी गुरुवारी रात्री २५ ते ३० ...

मलकापूर, कन्हेरवाडी ग्रामस्थांनी अडविल्या राखेच्या हायवा गाड्या
परळी : तालुक्यातील मलकापूर व कन्हेररवाडी येथील ग्रामस्थांनी गुरुवारी रात्री २५ ते ३० हायवा गाड्या रोखून ठेवल्या आहेत. राखेची अवैध वाहतूक थांबावी, यासाठी नागरिक त्रस्त असताना प्रशासन मात्र झोपेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक होत आहेत.
ग्रामस्थांच्या पवित्र्यानंतर प्रशासन सतर्क झाले असून उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांनी अवैध राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अंबाजोगाई यांना काढले आहेत.
परळी तालुक्यातील दाऊतपूर येथील राख तळ्यातील राख हायवा गाड्यातून वीटभट्ट्यांसाठी अवैधरीत्या, उघडी वाहतूक केली जाते. ही राख वाहतूक करत असताना हायवा टिप्परच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात वाहतूक होत असल्याने गतिरोधकाजवळ, रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पडत आहे.
पडलेली राख जाणाऱ्या गाड्यामुळे हवेत पसरते व मोठ्या प्रमाणावर हवेने उडते. यामुळे रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो. गुरुवारी रात्री मलकापूर येथे अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या हायवा टिप्परमधून राख पडल्याने गावातील एक दुचाकीस्वार जखमी झाला. गावकऱ्यांनी एकत्र येऊन या मार्गावरून वाहतूक करणारे जवळपास २५ ते ३० हायवा टिप्पर अडवून ठेवले आहेत.
परळी तालुक्यातील कन्हेररवाडी येथे राखेच्या गाड्या ग्रामस्थांनी रोखून ठेवल्या. काही दिवसांपूर्वीच पांगरी येथे महिलांनी अवैध वाहतूक करणाऱ्या टिप्परमधून राख पडून हवेचे प्रदूषण होत असल्याने हायवा अडवून या महिलांनी हायवा टिप्परच्या चालकाला पडलेली राख साफसफाई करण्यास भाग पाडले होते. दादाहरी वडगाव येथील ग्रामस्थ राखेच्या प्रदूषणाला त्रस्त होऊन गेल्या अनेक वर्षांपासून सहपरिवार रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.
एवढे सर्व नागरिक त्रस्त असताना औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राचे व स्थानिक प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेत असल्याने सातत्याने नागरिकांचा राग अनावर होत आहे. सातत्याने नागरिक हवेतील प्रदूषणामुळे बेजार होत असताना लवकरच मोठ्या प्रमाणावर आंदोलनाचा भडका होण्याची शक्यता आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलने करतील. यावेळी घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली होती.
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडू नये. राखेची अवैध वाहतूक थांबावी म्हणून अवैध राख वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्याचे आदेश उपप्रादेशिक अधिकाऱ्यांना दिले आहेत.
-नम्रता चाटे, उपजिल्हाधिकारी, परळी.
परळी तालुक्यातील पांगरीनंतर कन्हेरवाडी व मलकापूर येथील ग्रामस्थांनी राखेच्या प्रदूषणासंदर्भात आवाज उठविला आहे. प्रशासन काही करत नसल्याने ग्रामस्थांना राख प्रदूषणविरुद्ध लढा द्यावा लागत आहे. लवकरच भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा आंदोलनात उतरेल.
- शेख अब्दुल करीम, माजी नगराध्यक्ष, परळी
020721\facebook_1625204354985_6816601126933111968_14.jpg