ग्रामीण भागात लालपरी दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:41 IST2021-07-07T04:41:35+5:302021-07-07T04:41:35+5:30
पुरुषोत्तम करवा माजलगाव : तालुक्यात मागील साडेतीन महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ग्रामीण भागात सुरू असलेली बस सेवा बंद करण्यात ...

ग्रामीण भागात लालपरी दाखल
पुरुषोत्तम करवा
माजलगाव : तालुक्यात मागील साडेतीन महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ग्रामीण भागात सुरू असलेली बस सेवा बंद करण्यात आली होती. कोरोनाची लाट ओसरू लागल्याने येथील आगारातून ग्रामीण भागासाठी लालपरी सोमवारपासून धावू लागल्याने प्रवाशांची हेळसांड थांबणार आहे.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाची पहिली लाट आल्याने ग्रामीण भागात अनेक महिने बस सेवा बंद करण्यात आली होती. ऑगस्ट महिन्यात सुरळीत सुरू झालेली बससेवा फेब्रुवारी महिन्यापर्यंत सुरळीत सुरू झाली होती. त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात होताच मार्चमध्ये ही बससेवा पुन्हा पूर्णपणे बंद करण्यात आली. ७ जूनपासून केवळ शहरी भागात बससेवा सुरू करण्यात आली होती. परंतु ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या सुरुवातीपासून जास्त असल्याने ग्रामीण भागात बससेवा सुरू करण्यात आली नव्हती.
सध्या बीड जिल्ह्यासह माजलगाव तालुक्यात कोरोनाची लाट ओसरू लागल्याने येथील आगार प्रमुख दत्तात्रय काळम पाटील यांनी सोमवारपासून तालुक्यातील आबेगाव, पुरुषोत्तमपुरी, गुंजथडी, मंजरथ, हिवरा, टाकरवण, जीवनापूरसह अनेक गावात सोमवारपासून बससेवा सुरू करण्यात आली. यामुळे ३०-४० गावच्या प्रवाशांचा इतर शहरांशी संपर्क जोडला जाऊ लागला. यामुळे प्रवाशांमध्ये आनंद व्यक्त केला जाऊ लागला आहे.
प्रवाशांची अडवणूक थांबणार
ग्रामीण भागातील बस सेवा बंद असल्याने प्रवाशांना इतर गावाशी ये-जा करण्यासाठी अवैध प्रवासी वाहतुकीचा सहारा घ्यावा लागत होता. या अवैध प्रवासी वाहनधारकांकडून प्रवाशांची अडवणूक करण्यात येऊन मनमानी भाडे आकारून जोपर्यंत गाडी भरत नाही तोपर्यंत अडवून ठेवण्यात येत असल्याने प्रवासी खूपच हैराण झाले होते.
सध्या माजलगाव आगारातून ७ ते ८ ठिकाणी बस सेवा सुरू करण्यात आली. सध्या प्रत्येक गावाला संध्याकाळी अशा दोन फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. लवकरच प्रत्येक गावाला बससेवा पुन्हा सुरू करण्याचा आमचा मानस आहे.
-दत्तात्रय काळम पाटील
आगार प्रमुख, माजलगाव
060721\img_20210613_134005_14.jpg