परळी ( बीड) : आपल्या अपहरण व खंडणी प्रकरणातील पाच आरोपींना अवघ्या पाच दिवसात पोलीस प्रशासनाने अटक करून मुद्देमाल ही जप्त केला आहे. अपहरणकर्त्यांच्या अटकेसाठी धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांनी प्रयत्न केले होते. मात्र, माझ्या बाबतीत घडलेल्या या घटनेच्या आडून आष्टीचे आमदार सुरेश धस राजकारण करीत असल्याचे परळीचे उद्योजक अमोल विकासराव डुबे यांनी स्पष्ट केले आहे.
अमोल डूबे यांनी सांगितले की, ९ डिसेंबर रोजी काही गुन्हेगारांनी माझे अपहरण केले होते. त्यानंतर माझ्या कुटुंबाने संपर्क करताच मंत्री धनंजय मुंडे, मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पोलिसांना सूचना केल्या. यामुळेच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपींना जलद गतीने अटक करत खंडणीचा मुद्देमाल ही जप्त केला आहे. मात्र, या घटनेचा आधार घेत आ. सुरेश धस यांनी चुकीची माहिती माध्यमांना देत आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार केला आहे, असे डुबे यांनी म्हटले आहे.
डुबे व मुंडे कुटुंबात वितुष्ट आणू नयेआमचे दोन पिढ्यांपासून मुंडे कुटुंबियांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. नेहमी एकमेकांच्या सुख-दुःखात आम्ही सहभागी असतो. त्यामुळे आमच्या कुटुंबावर संकट येताच मुंडे कुटुंबाने आमची मदत केली. अवघ्या पाच दिवसात गुन्ह्यातील आरोपींना मुद्दे-मालासह अटक केले, याबद्दल आम्ही पोलिसांचे जाहीर आभार देखील व्यक्त केले आहेत. मात्र या घटनेच्या आडून डुबे व मुंडे कुटुंबाच्या अनेक वर्षांच्या संबंधात वितुष्ट आणू नये, असे आवाहनही अमोल डुबे यांनी केले आहे.