परळीतून दरारोज शेकडो टिप्परने अवैध राख वाहतूक केली जाते. या वाहतुकीसंदर्भात माणिक फड व समस्त कन्हेरवाडी गावकरी मंडळ यांच्या नेतृत्वाखाली वेळोवेळी प्रशासनाला निवेदन देऊनही कुठलीही कारवाई केली नाही. समस्त गावकरी मंडळींनी रास्ता रोकोचा इशारा दिल्यानंतरही प्रशासनाला जाग आलेली नाही. ६ जुलै रोजी सकाळी ९ वाजेपासून राष्ट्रवादीचे युवक नेते माणिक फड व समस्त गावकरी मंडळ एकता संघर्ष समिती यांनी रास्ता रोको केला.
यावेळी माणिक फड, भास्कर रोडे (रिपाइं राज्य सचिव), नगरसेवक प्रा. पवन मुंडे, माऊली फड, निवृत्ती फड, समाधान मुंडे, विशाल रोडे, कैलास फड, अंबादास रोडे, महादेव रोडे उपस्थित होते. कन्हेरवाडी येथे आंदोलनस्थळी निवेदन स्वीकारण्यासाठी परळीचे नायब तहसीलदार बी. एल. रूपनर, ग्रामीण पोलीस स्टेशनचे सपोनि मारोतराव मुंडे, तलाठी विष्णू गीते व इतर कर्मचारी हजर होते. यावेळी परळी व अंबाजोगाई या दोन्ही बाजूने दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. नायब तहसीलदार बी. एल. रूपनर यांना ग्रामस्थांच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दाऊतपूर शिवारातून हजारो टन राखेची अवैधरीत्या वाहतूक केली जाते. याकडे आरटीओ, पोलीस प्रशासन व तहसील प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे परळी परिसर परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.