अंधत्व प्राप्त झालेल्यांना नेत्रशस्त्रक्रियेतून नवीदृष्टी देणे हेच आता माझे कर्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:42 IST2021-07-07T04:42:07+5:302021-07-07T04:42:07+5:30
अविनाश मुडेगावकर अंबाजोगाई : दृष्टीदाता हा किताब मला लोकमतनेच दिला. तो सार्थ ठरविण्यासाठी आता सेवानिवृत्तीनंतर अंधत्व प्राप्त झालेल्यांना नेत्रशस्त्रक्रियेच्या ...

अंधत्व प्राप्त झालेल्यांना नेत्रशस्त्रक्रियेतून नवीदृष्टी देणे हेच आता माझे कर्तव्य
अविनाश मुडेगावकर
अंबाजोगाई : दृष्टीदाता हा किताब मला लोकमतनेच दिला. तो सार्थ ठरविण्यासाठी आता सेवानिवृत्तीनंतर अंधत्व प्राप्त झालेल्यांना नेत्रशस्त्रक्रियेच्या माध्यमातून नवी दृष्टी देण्यासाठी अंबाजोगाई, मुंबई व औरंगाबाद येथे "रघुनाथ नेत्रालयाची" उभारणी करून रुग्णसेवा हीच माझी भावी वाटचाल राहील. ना नफा, ना तोटा तसेच चॅरिटीच्या माध्यमातून हे काम आपण पुढे घेऊन जाणार आहोत. महिन्यातून किमान ५ दिवस अंबाजोगाईत येऊन नेत्र शस्त्रक्रिया करण्यात येतील, असा संकल्प महाराष्ट्र राज्याचे सेवानिवृत्त वैद्यकीय संचालक, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.
लोकमतच्या महारक्तदान अभियानानिमित्त ते अंबाजोगाईत आले होते. यावेळी त्यांनी लोकमतशी दिलखुलास संवाद साधला. माझ्या जडणघडणीत लोकमतचा मोठा वाटा आहे. लोकमत गौरव, महाराष्ट्रीयन ऑफ द इयर असा दोन वेळा माझा सन्मान लोकमतच्या माध्यमातून झाला. लोकमत परिवाराशी आपले कौटुंबिक नाते असल्याचेही त्यांनी सांगितले.
रुग्णसेवा देत असताना आजपर्यंत आपण स्वतः १ लाख ६२ हजार नेत्र शस्त्रक्रिया केल्या आहेत. आजपर्यंत ६६७ नेत्रशिबिर घेण्यात आले. यातील १०० शिबिरे बीड जिल्ह्यात झाली. आजपर्यंत ५० लाखांपेक्षा जास्त रुग्णांची तपासणी करून शिबिरांच्या माध्यमातून लाखो रुग्णांना दृष्टी मिळाली आहे. एक डॉक्टर ते संचालक असा माझा प्रवास झाला. तरीही आगामी काळात माझी रुग्णसेवा अखंडित सुरूच राहील. यासाठीच "रघुनाथ नेत्रालयाच्या" माध्यमातून हे काम पुढे नेणार आहे.
वैद्यकीय विभागाचा संचालक म्हणून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्रासाठी घेता आले. मुंबईचे जे जे हॉस्पिटल भारतात पहिल्या पाच क्रमांकावर आणता आले. वर्षाला ५ लाख रुग्णांवर उपचार व्हायचे, तिथे आता १० लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नंदुरबार व बारामती येथे नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कोरोनाच्या साथीत टास्क फोर्सच्या माध्यमातून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्यातील पहिली व दुसरी लाट आटोक्यात आणण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्या लागल्या. ग्रामीण भागातील आरोग्ययंत्रणा सक्षम करता आली, असे ते म्हणाले.
कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी दररोज नवीन गाईडलाईन्स दिल्या जात होत्या. अचानक ऑक्सिजन पुरवठ्याची वाढलेली मागणी, रेमडेसिवीरचा पुरवठा, मृत्यूदर रोखण्यात आलेले यश, या सर्व कामात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री अमित देशमुख यांचे मोठे पाठबळ लाभले. तिसरी लाट रोखण्यासाठीही अनेक ठोस उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. सर्व मेडिकल कॉलेजमध्ये नवीन एक लाख बेड निर्माण करण्यात आले. लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी १०० बेडचे आयसीयू, ऑक्सिजन प्रकल्पांमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. औषध, व्हेंटिलेटर यांचीही मोठी उपलब्धता करण्यात आली आहे. ऑक्सिजनची उपलब्धता १३०० मेट्रिक टनवरून आता २२०० मेट्रिक टन करण्यात आली असल्याने भविष्यात महाराष्ट्रात ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही.
कसा रोखता येईल ‘डेल्टा प्लस’ आजार
हा आजार रोखण्यासाठी मास्कचा वापर सक्तीने झाल्यास व दोन्ही लसीचे डोस घेतल्यास ९८ टक्के आजार रोखता येईल. यासाठी लसीकरण करून घेणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या आजाराला आळा बसल्यास संभाव्य तिसरी लाट सौम्य असेल; मात्र यासाठी मास्कचा सक्तीने वापर, सोशल डिस्टन्स व लसीकरण महत्त्वाचे आहे. अशी स्थिती राहिली तर येत्या मार्च महिन्यापर्यंत परिस्थिती पूर्ववत होऊ शकते, असे डॉ. लहाने म्हणाले.
060721\06bed_7_06072021_14.jpg
लहाने तात्याराव