लॉकडाऊनचे नियम पाळल्यास व्यवहार लवकर सुरळीत होतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:25 IST2021-06-04T04:25:29+5:302021-06-04T04:25:29+5:30
बीड : जिल्ह्यातील रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे. मात्र, इतर काही जिल्ह्यांप्रमाणे आपल्या जिल्ह्यातील व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरळीत होण्यासाठी लॉकडाऊनचे काटेकोर ...

लॉकडाऊनचे नियम पाळल्यास व्यवहार लवकर सुरळीत होतील
बीड : जिल्ह्यातील रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे. मात्र, इतर काही जिल्ह्यांप्रमाणे आपल्या जिल्ह्यातील व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरळीत होण्यासाठी लॉकडाऊनचे काटेकोर पालन करणे गरजेे आहे. तसेच दुसऱ्या लाटेत प्रशासनाने केलेल्या उत्तम कामगिरीमुळे व नागरिकांच्या सहकार्यामुळे टेस्टच्या तुलनेत पॉझिटिव्ह येणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करावे, गर्दी टाळावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषेदत नागरिकांना केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक आर. राजा, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छींद्र सुकटे, तहसीलदार शिरीष वमने यांची उपस्थिती होती. दरम्यान, मागील लाट ७ एप्रिल ते २८ फेब्रुवारी या दरम्यान १९ हजार १६८ रुग्ण संख्या होती. तर, दुसऱ्या लाटेत म्हणचे ३ मार्च ते ३ जून या काळात तपासणीच्या तुलनेत ६८ हजार जणांना कोरोनाची लागण झाली होती. मागील लाटेत ५८९ मृत्यू झाले तर, या लाटेत १,४३२ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी लॉकडाऊनचे पालन करावे, असे आवाहनदेखील यावेळी रवींद्र जगताप यांनी केले. कायदा आणि सुव्यवस्था पाळणे सर्वांची जबाबदारी असून, भंग केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारादेखील यावेळी प्रशासनाकडून देण्यात आला.
म्युकरमायकोसिस रुग्णांवर होणार प्रभावी उपचार
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयात म्युकरमायकोसिस या आजारावर उपचार होत आहे. त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध आहे, तसेच यातील तज्ज्ञ डॉक्टरदेखील आहेत. दरम्यान, या ठिकाणी यंत्रसामग्री उपलब्ध असल्यामुळे उपचार होत असून, अन्य एक मशीन घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे या रुग्णांवर उपचार करण्यास गती मिळणार आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत १२८ रुग्ण आढळले होते. त्यापैकी १७ जण पूर्ण बरे झाले आहेत तर, १९ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील १२७ जणांना कोरोनाची यापूर्वी लागण झाली होती. ९० जणांना मधुमेहाचा आजार असल्याचे समोर आले होते.
संभाव्य धोका लक्षात घेत केली तयारी -कुंभार
तिसऱ्या लाटेत बालकांना धोका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता, जिल्ह्यात दरवर्षी ४९ हजार प्रसूती होतात. त्यामुळे नवजात शिशू १ ते २८ दिवस यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून १९६ पॉझिटिव्ह बेड तर १९६ निगेटिव्ह बेड तयार करण्यात आले आहेत. तर, लहान मुलांसाठी आयसीयू १०० बेडची तयारी करण्यात आली आहे. तसेच एनआयसीयूचे ८४, इतर ५०६ खाटा तयार आहेत. त्यांच्यावर उपचारासाठी लागणारी सर्व औषधी साठा उपलब्ध करून ठेवला आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिली.
तर, कायदेशीर कारवाई होणार
१५ जूनपर्यंत कोरोना संकटामुळे व आपल्या जिल्ह्यातील रुग्णसंख्या लक्षात घेता लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. या काळात मोर्चा काढला तर, कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी समाजिक भान लक्षात घेत घराच्या बाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी नागरिकांना केले.
===Photopath===
030621\03_2_bed_10_03062021_14.jpeg
===Caption===
पत्रकारपरिषदेत माहिती देताना जिल्हाधिकारी रविंद्र जगताप मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार पोलीस अधीक्षक आर.राजा आदी.