आरोग्य विभाग म्हणतोय, कोरोनाबाधित महिलेची अनावधाने विसरली नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:23 IST2021-06-03T04:23:57+5:302021-06-03T04:23:57+5:30
बीड : महिलेच्या मृत्यूनंतर कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने नातेवाईक मृतदेह घेऊन गेले, परंतु ही महिला बाधित असून मृतदेह पळविला ...

आरोग्य विभाग म्हणतोय, कोरोनाबाधित महिलेची अनावधाने विसरली नोंद
बीड : महिलेच्या मृत्यूनंतर कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने नातेवाईक मृतदेह घेऊन गेले, परंतु ही महिला बाधित असून मृतदेह पळविला असा आरोप करत नातेवाईकांवर गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण अंगलट येण्याच्या भीतीने आरोग्य विभागाने आता पलटी मारली आहे. ही महिला कोरोनाबाधित होती, परंतु अनावधनाने नोंद करण्यास विसरल्याचे सांगितले आहे. चौकशी समितीच्या अहवालातून हा प्रकार उघड झाला आहे.
गेवराई तालुक्यातील कुंभारवाडी येथील लता सुरवसे या महिलेला २१ एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. २४ दिवस तिच्यावर कोरोनाबाधित म्हणून उपचार केले. १७ मे रोजी तिचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर तिची कोरोना चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली. त्यामुळे नातेवाईक मृतदेह घेऊन गावी गेले. एवढ्यात आरोग्य विभागाने कॉल करून नातेवाईकांना मृतदेह परत आणण्यास सांगितले. नंतर बीडमध्ये अंत्यसंस्कार झाले, परंतु तरीही आरोग्य विभाग शांत न राहता नर्सला पुढे करत नातेवाईकांवर मृतदेह पळविल्याचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची चौकशी आतापर्यंत सुरू होती.
दरम्यान, यात डॉक्टर, परिचारिका, लॅब टेक्निशियन, नातेवाईक यांचे जबाब घेण्यात आले. याचा अहवाल तयार करून समितीने जिल्हा शल्य चिकित्सकांकडे अहवाल सादर केला. यात नर्स व डॉक्टरांचा योग्य संवाद झाला नाही, नातेवाईकांच्या दबावापाेटी चाचणी केली, तसेच या महिलेची यापूर्वीच ॲंटिजन चाचणी केली होती, परंतु त्याची नोंद अनावधानाने विसरल्याचा निष्कर्ष यातून काढण्यात आला आहे. यात अनेक तफावत असून आरोग्य विभागाच्या अंगलट हे प्रकरण येणार असल्याने यातून पळवाटा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सीएस आणि समितीवरही संशय
एवढे गंभीर प्रकरण असतानाही समितीने अहवाल देण्यास उशीर केला. तसेच कागदपत्रांची पाहणी न करताच केवळ जबाब घेऊन गोलगाेल अहवाल दिल्याने व अहवाल प्राप्त होऊनही तत्काळ निर्णय न घेतल्याने जिल्हा शल्यचिकित्सकही संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
महिलेची चाचणीच नाही
लता सुरवसे रुग्णालयात दाखल झाल्यापासून कोरोना चाचणीच झालेली नाही. झाली असती तर चाचणीचा सॅम्पल आयडी समितीपुढे का सादर केला नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. जिल्ह्यातील ८६ हजार बाधितांची नोंद होते आणि याच महिलेची का विसरते? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचे झाले आहे.
चौकशी समितीचा अहवाल आला आहे. यात या महिलेची ॲंटिजन चाचणी केली होती, परंतु, अनावधानाने नोंद राहिल्याचे दिसते. तसेच अनेक मुद्दे आहेत. यावर लवकरच निर्णय घेऊ.
डॉ.सूर्यकांत गित्ते, जिल्हा शल्यचिकित्सक बीड