'जाचक अटीने आपल्याला कर्जमाफी मिळणार नाही', असे म्हणत त्याने केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 19:37 IST2017-08-24T19:35:15+5:302017-08-24T19:37:16+5:30
कर्ज माफीच्या जाचक अटींमुळे आपण कर्जमाफीत बसणार नाही, असा समज झाल्याने चंद्रसेन गायकवाड (३५ ) या शेतक-याने राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.

'जाचक अटीने आपल्याला कर्जमाफी मिळणार नाही', असे म्हणत त्याने केली आत्महत्या
पाटोदा (बीड ), दि. २४ :कर्ज माफीच्या जाचक अटींमुळे आपण कर्जमाफीत बसणार नाही, असा समज झाल्याने चंद्रसेन गायकवाड (३५ ) या शेतक-याने राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.
चंद्रसेन हे वडीलांच्या नावे असलेली दोन एकर जमीन कसत असत. हे जमीनही सुपीक नसून मुरमाड आहे. यंदा पावसाने ओढ दिल्याने शेतात काही पिकणार नाही. डोक्यावर असलेले बँकेचे कर्ज व खाजगी कर्ज कसे फेडावे या विवंचनेतच चंद्रसेन नेहमी असायचे. यातच शासनाने कर्जमाफीत घातलेल्या अटीं खूपच जाचक आहेत ,याची पूर्तता आपण करू शकणार नाहीत. यामुळे आपणास कर्जमाफी मिळणार नाही असा भ्रमनीरास झाल्याने शेवटी त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले .
मुलगा जन्मल्याचे गावभर वाटले होते पेढे
चंद्रसेन यास अगोदरच्या दोन मुली आहेत. बुधवारी मुलगा झाला . पत्नी बाळंतपणासाठी माहेरी आहे . मुलगा झाल्याची माहिती कळल्यानंतर त्याने गावभर पेढे वाटले होते. या आनंदात असताना आज सकाळी त्यांनी आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे .