गर्दीच्या ठिकाणी मोबाइल सांभाळा, दररोज होत आहेत १२ तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:41 IST2021-07-07T04:41:26+5:302021-07-07T04:41:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. त्यात आता कुठे बाजारपेठ निर्बंधांसह उघडण्यात आली आहे. त्यामुळे ...

गर्दीच्या ठिकाणी मोबाइल सांभाळा, दररोज होत आहेत १२ तक्रारी
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. त्यात आता कुठे बाजारपेठ निर्बंधांसह उघडण्यात आली आहे. त्यामुळे बाजारपेठेत गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान, याच गर्दीचा फायदा घेऊन भुरट्या चोऱ्या करणारे संधी साधत आहेत. यात सराईत मोबाइल चोरांचाही समावेश आहे. बीड शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणांवरून दररोज मोबाइल चोरी गेल्याप्रकरणी १२ तक्रारी पोलीस ठाण्यात केल्या जात आहेत. अनेक वेळा स्थानिक गुन्हे शाखेकडून मोबाइल चोरी करणारे ताब्यात घेतले आहेत. मात्र, घटनांमध्ये कायम वाढ होत असल्यामुळे गर्दीच्या ठिकाणी मोबाइल सांभाळणे गरजेचे आहे.
अनेक पोलीस ठाण्यांत मोबाइल चोरीची तक्रार लगेचच देण्यासाठी गेल्यानंतर मोबाइल चोरीचा गुन्हा दाखल करून घेतला जात नाही. पहिले दोन दिवस शोध घ्या. मिळाला तर बघा, असे सांगण्यात येते, तर काहींची जुजबी तक्रार दाखल करून घेतली जाते. त्यामुळे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण जरी कमी असले, तरी सरासरी दररोज १२ मोबाइल गायब होत असल्याची सूत्रांची माहिती आहे. अनेक प्रकरणांमध्ये चोरीचा मोबाइल मूळ मालकास परत मिळत नसल्याचे चित्र आहे. मोबाइल चोरीच्या घटना बाजार व प्रवासादरम्यान, तसेच गर्दीच्या ठिकाणी होतात. दरम्यान, मोबाइल चोरीची तक्रार पोलीस ठाण्यात घेऊन गेल्यानंतर एक अर्ज तक्रारदारास दिला जातो. त्या अर्जात कुठून व कसा मोबाइल चोरी गेला, याची माहिती, तसेच इतर मजकूर भरला जातो. हा अर्ज पोलीस ठाण्यात देण्यात आल्यानंतर, त्यावर पोहोच पावतीचा शिक्का दिला जातो. अनेक प्रकरणांत एवढेच सोपस्कार मोबाइल चोरी प्रकरणात पार पाडले जातात. काही प्रकरणांत मोबाइल चोरीचे गुन्हे उशिरा दाखल करून घेतले जातात. मात्र, चोरीला गेलेला मुद्देमाल मिळेलच, याची खात्री मोबाइल मालकाला नसतेच. त्यामुळे मोबाइल चोरीमध्ये पोलीस ठाण्यांकडून योग्य तो तपास करून, या चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
....
१४४२२ नंबर डायल करा
मोबाइल फोन हरवला किंवा चोरीला गेल्यानंतर १४४२२ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर डायल केल्यानंतर तुमची तक्रार नोंदविण्यात येईल, तसेच तुमच्या फोनचे नेटवर्क बंद होईल. आयएमईआय क्रमांकावरून ऑपरेटर नेटवर्क ब्लॉक होते, जेणेकरून त्या मोबाइलचा दुरुपयोग होणार नाही.
----
बीड जिल्ह्यात काही ठिकाणी आयएमईआय क्रमांक बदलण्याचे मोठे रॅकेट सक्रिय झाले होते. या ठिकाणी हा क्रमांक बदलल्यानंतर चोरीतील सर्व मोबाइल इतर राज्यांत पाठविण्यात येत होते किंवा त्याची विक्री केली जात होती. अशी मोठी साखळी अद्यापही कार्यरत असल्याचे चोरीच्या घटनेवरून दिसून येत आहे.
...
बीड शहरात या ठिकाणी सांभाळा मोबाइल
राजीव गांधी चौक
भाजी मंडई
बाजार समिती
सुभाष रोड
पेठ बीड बार्शी नाका जालना रोड
नगर रोड
....
मोबाइल चोरीला जाताच तातडीने हे करा
मोबाइल चोरीला गेल्यानंतर तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार करावी, तसेच मोबाइलमधील ईमेल व इतर ॲपचे पासवर्ड बदलून घ्यावेत. ऑनलाइन बँकिंग असल्यास त्वरित संबंधित बँकेला याची कल्पना द्यावी. खात्यातील व्यवहार बंद करावेत. आपण वापरत असलेला मोबाइल क्रमांक ब्लॉक करावा, जेणेकरून गैरवापर होणार नाही.
...
९७ टक्के मोबाइल परत मिळत नाहीत
जिल्ह्यात दररोज प्रवासादरम्यान बाजारात खरेदी करताना नागरिकांचे मोबाइल मोठ्या प्रमाणात चोरीस जातात, परंतु यातील जवळपास ९७ टक्के मोबाइल मिळून येत नाहीत, तसेच ते मूळ मालकांना मिळत नाहीत. अनेक प्रकरणांत मोबाइल चोरीचा गुन्हा दाखल करून घेतला जात नसल्यामुळे संबंधित पोलीस ठाण्यास त्या मोबाइल चोरीचा तपास करणे बंधनकारक राहत नाही. त्यामुळे फक्त त्याच नंबरचे सिम मिळण्यासाठी फक्त मोबाइल गहाळच्या तक्रारी करून घेतल्या जातात, परंतु नागरिकांनीही गुन्हा दाखल करून घेण्याचा आग्रह धरून गुन्हा दाखल करावा किंवा वरिष्ठांशी बोलावे.
...
मोबाइल चोरीत अल्पवयीन मुले
बीड शहरातील राजीव गांधी चौकात मोबाइल चोरताना, एका अल्पवयीन मुलाला काही दिवसांपूर्वी ताब्यात घेतले होते. त्याच्यावर कारवाईही करण्यात आली. दरम्यान, या कामासाठी सर्रास अल्पवयीन मुलांचा वापर होत असल्याची सूत्रांची माहिती आहे.
....
स्थानिक गुन्हे शाखेकडून कारवाईत अनेक वेळा मोबाइल चोरट्यांची टोळी पकडण्यात आलेली आहे. या मोबाइल चोरांच्या संदर्भात चोहोबाजूने तपास सुरू असून, लवकरच मोठी कारवाई केली जाईल.
- भारत राऊत, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख, बीड
...