किराणा ४ तर कृषी दुकाने ७ तास उघडी राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:25 IST2021-06-01T04:25:13+5:302021-06-01T04:25:13+5:30

बीड : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. आणखी प्रभावीपणे ही संख्या कमी करण्यासाठी जिल्ह्यात पुन्हा १ जून ...

Grocery 4 and agricultural shops will be open for 7 hours | किराणा ४ तर कृषी दुकाने ७ तास उघडी राहणार

किराणा ४ तर कृषी दुकाने ७ तास उघडी राहणार

बीड : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. आणखी प्रभावीपणे ही संख्या कमी करण्यासाठी जिल्ह्यात पुन्हा १ जून ते १५ जूनपर्यंत लॉकडाऊन ‘जैसे थे’ ठेवण्यात आले आहे. या कालावधीत अत्यावश्यक वस्तू जसे किराणा, भाजीपाला, फळे, चिकन, मटन विक्रीसाठी रोज सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सूट देण्यात आली आहे. मात्र, शनिवार आणि रविवारी या आस्थापना पूर्णपणे बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी ३१ मे रोजी काढले आहेत.

लॉकडाऊनच्या काळात सर्व औषधालये, दवाखाने, निदान क्लिनिक, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, फार्मास्युटिकल्स, फार्मास्युटिकल कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा ज्यात सहायक उत्पादन आणि वितरण युनिट तसेच त्यांचे डीलर्स, वाहतूक आणि पुरवठा साखळी, लसींचे उत्पादन व वितरण, पेट्रोलपंप, टपाल सेवा इत्यादी अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या आस्थापना पूर्णवेळ चालू राहणार आहेत.

तर, दूधविक्री केवळ प्रत्येक दिवशी सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत सुरू राहील. गॅस वितरण दिवसभर सुरू राहणार आहे. बँक ग्राहक सेवा केंद्रांचे कामकाज शासनाच्या नियमित वेळापत्रकानुसार पूर्ण वेळ सुरू राहणार आहे.

शासकीय कार्यालये नियमित वेळेप्रमाणे २५ टक्के उपस्थितीत सुरू राहतील. लसीकरणाकरिता ४५ वर्षांवरील ज्या व्यक्तींचा दुसरा डोससाठी मेसेज आला आहे, आरोग्य विभागाचे पत्र आले आहे. त्यांनाच लसीकरणाचा डोस घेण्यासाठी जाण्यास परवानगी असणार आहे.

कृषी दुकाने ७ ते २

कृषी व्यवसायाशी संबंधित दुकानांमध्ये बियाणे, खते, औषधे केवळ गोडाऊनला किंवा दुकानामध्ये उतरून घेण्यास मुभा देण्यात आली. तसेच शेतकऱ्यांना सकाळी ७ ते २ पर्यंत खरेदी करता येणार आहे. नरेगा कामांच्या ठिकाणी सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझरचा व कोविडविषयक जे नियम आहेत ते पाळणे बंधनकारक असेल. स्वस्त धान्य दुकानदारांना सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेतच लाभार्थींना धान्य वितरण करण्यास मुभा राहील. लाभार्थींनी आधार, रेशनकार्ड सोबत ठेवणे गरजेचे आहे.

नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई

जिल्ह्यातील सर्वप्रकारची मद्यविक्री पूर्णवेळ बंद राहणार आहे. १ ते १५ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यंत या कालावधीत निर्बंध असलेल्या आस्थापना चालू असल्याचे निदर्शनास आल्यास त्या सील करण्यात येतील. त्यांचा परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. रुग्णसंख्या कमी होत असून, नियमांचे पालन केल्यास जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी केले आहे.

Web Title: Grocery 4 and agricultural shops will be open for 7 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.