नरेगासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण होईपर्यंत ग्रामसेवकांचा कामावर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:39 IST2021-08-18T04:39:22+5:302021-08-18T04:39:22+5:30

प्रशासनाच्या नोटिसीनंतर पवित्रा : अपहार, अनियमितता झाली नसल्याचा दावा बीड : ‘काम केले प्रशासनाने आणि बळीचे बकरे म्हणजे ग्रामसेवक’ ...

Gramsevaks boycott work till a separate mechanism is created for NREGA | नरेगासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण होईपर्यंत ग्रामसेवकांचा कामावर बहिष्कार

नरेगासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण होईपर्यंत ग्रामसेवकांचा कामावर बहिष्कार

प्रशासनाच्या नोटिसीनंतर पवित्रा : अपहार, अनियमितता झाली नसल्याचा दावा

बीड : ‘काम केले प्रशासनाने आणि बळीचे बकरे म्हणजे ग्रामसेवक’ या धोरणामुळे बीड जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक ैहैराण झाले असून, जोपर्यंत नरेगासाठी ग्रामसेवक वगळता स्वतंत्र यंत्रणा निर्माण होत नाही, तोपर्यंत बीड जिल्ह्यातील ग्रामसेवक संघटना नरेगाच्या सर्व कामावर बहिष्कार टाकत असल्याची माहिती जिल्हा ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष बळिराम उबाळे व सचिव भगवान तिडके यांनी दिली.

सध्या गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांना नरेगा विषयात नोटिसा बजावलेल्या आहेत. त्यामध्ये मागील १० वर्षांत झालेल्या लेखापरीक्षण अहवालातील आक्षेप नोंदविलेले आहेत. परंतु, हे लेखा आक्षेप ग्रामपंचायतीला ७ ते १० वर्षांपासून प्राप्त झालेले नाहीत. या आक्षेपांबाबत ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, रोजगार सेवकांना कसल्याही प्रकारची माहिती नसल्यामुळे आक्षेपांची पूर्तता करण्याची संधी मिळालेली नाही. काही बँका व लेखापरीक्षकांच्या तांत्रिक चुकांमुळे रोखीने देयक दिल्याचे आक्षेप नोंदविले आहेत. वास्तविक ग्रामपंचायतीने संबंधित एजन्सी किंवा लाभार्थींना धनादेशाद्वारे रकमा दिलेल्या आहेत. तसेच वैयक्तिक ज.ल.वि. व इतर वैयक्तिक कामे पूर्ण होऊन त्यांची देयके (कुशल) दोन ते तीन वर्षांनी ग्रामपंचायतीला प्राप्त होतात. त्यामुळे या कालावधीत कोणतीही एजन्सी किंवा दुकानदार उधारीवर थांबत नसल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी पदरमोड करून त्यांचे पैसे दिलेले असतात. साधारणत: दोन वर्षांनंतर कुशल देयके प्राप्त झाल्यावर ग्रामपंचायतीने संबंधित शेतकऱ्यांना चेकद्वारे कुशल देयके अदा केलेली आहेत. त्यामुळे या कामात कसल्याही प्रकारचा अपहार किंवा अनियमितता झालेली नसल्याचे उबाळे यांनी सांगितले. तसेच नरेगा यंत्रणा ही केंद्र शासनाची योजना असून, राज्य शासन किंवा वेगळी यंत्रणा नाही. त्यामुळे योजना राबविण्यासाठी व कंत्राटी पद्धतीची यंत्रणा निर्माण केली, ज्यामध्ये तालुका स्तरावर ग.वि.अ., शाखा अभियंता, लेखा अधिकारी, वि.अ., एपीओ, डीपीओ, डाटा एंट्री ऑपरेटर्स यांच्यामार्फत फाईल जाते. ग्रामपंचायतीकडूनही मंजूर कामाची हजेरी पत्रके व कुशल देयके या यंत्रणेकडून तपासून दिली जातात. त्यामुळे नरेगात चुका होण्याची शक्यता नसते. लेखापरीक्षकांनी काढलेल्या आक्षेपानुसार नोटीस फक्त ग्रामसेवक, सरपंचांनाच देण्यात आल्या आहेत. हा प्रकार म्हणजे काम केले प्रशासनाने आणि बळीचे बकरे म्हणजे ग्रामसेवक, त्यामुळे बीड जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक हैराण झाले आहेत. त्यामुळे सततच्या होणाऱ्या त्रासाला व जाचाला वैतागून ग्रामसेवक न्यायासाठी राज्य शासन व न्यायालयाकडे दाद मागत आहेत. जोपर्यंत नरेगासाठी ग्रामसेवक वगळता स्वतंत्र यंत्रणा निर्माण होत नाही, तोपर्यंत बीड जिल्ह्यातील ग्रामसेवक संघटना या नरेगाच्या सर्व कामांवर बहिष्कार टाकत आहे, असे बळिराम उबाळे व भगवान तिडके यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविले आहे.

Web Title: Gramsevaks boycott work till a separate mechanism is created for NREGA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.