ग्रामपंचायतींची करवसुली थकली; विकासकामांना ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:41 IST2021-07-07T04:41:38+5:302021-07-07T04:41:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : कोरोनामुळे मार्च महिन्यातच सलग दोन वर्षे ...

ग्रामपंचायतींची करवसुली थकली; विकासकामांना ब्रेक
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : कोरोनामुळे मार्च महिन्यातच सलग दोन वर्षे लॉकडाऊन झाल्याने ग्रामपंचायतींची मागील वर्षाची थकबाकी मोठ्या प्रमाणात रखडली आहे. परिणामी वसुली थकल्याने विकासकामांना मोठा ब्रेक बसला आहे. अनेक ग्रामपंचायतींच्या कर्मचा-यांचे वेतनही वसुलीअभावी रखडले आहे.
अंबाजोगाई तालुक्यात एकूण ९९ ग्रामपंचायती आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यवहार जवळपास ठप्प राहिले. याचा मोठा परिणाम म्हणून सर्वच ग्रामपंचायतींच्या विविध करांची थकबाकी वसुली करणे थांबले. प्रत्येकवर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस ते मे महिन्यापर्यंत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात करवसुली होते. गुढीपाडव्यानंतर शेतक-यांकडे रब्बी हंगामाचा पैसा उपलब्ध होतो व आर्थिक उलाढाली मोठ्या प्रमाणात होतात. मात्र गेल्या दोन वर्षांत यावर्षी मार्च महिन्याच्या प्रारंभीपासूनच कोरोनाच्या आजाराने ग्रामस्थ धास्तावलेले होते. त्यानंतर लॉकडाऊन पडल्यामुळे सर्वच व्यवहार ठप्प राहिले. अशा स्थितीतही गावोगावच्या ग्रामपंचायतींनी स्वच्छतेवर मोठा खर्च केला. गावची स्वच्छता, फवारणी, धूर फवारणी व आरोग्यविषयक जनजागृती, लॉकडाऊनच्या कालावधीत ग्रामस्थांना संरक्षण अशा विविध बाबींवर ग्रामपंचायतींचा मोठा खर्च झाला. पाणीपुरवठा योजना कार्यान्वित राहिल्या. ग्रामपंचायतींनी लॉकडाऊन असतानाही सर्व सोयी-सुविधा ग्रामस्थांना उपलब्ध करून दिल्या.
....
कर वसुलीसाठी प्रयत्नशील
अंबाजोगाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. संदीप घोणशीकर यांच्याकडे विचारणा केली असता, कोरोनाच्या कालावधीत वसुली थकली होती. अशाही स्थितीत नागरिकांना सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. गावचा गाडा हा गावातील करांवरच मोठ्या प्रमाणात चालतो. यासाठी कर वसुलीही झाली पाहिजे. त्या त्या गावातील ग्रामसेवक ग्रामस्थांकडून कर वसुलीसाठी प्रयत्नशील असल्याचे घोणशीकर ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले.