सरकारची काटकसर; पूरक पोषण आहारात तेलाऐवजी साखर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:25 IST2021-06-02T04:25:19+5:302021-06-02T04:25:19+5:30

बीड : मागीलवर्षी कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी केंद्रांना पूरक पोषण आहार पॅकिंग करून पुरवठा करण्याचे ...

Government austerity; Sugar instead of oil in dietary supplements! | सरकारची काटकसर; पूरक पोषण आहारात तेलाऐवजी साखर !

सरकारची काटकसर; पूरक पोषण आहारात तेलाऐवजी साखर !

बीड : मागीलवर्षी कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी केंद्रांना पूरक पोषण आहार पॅकिंग करून पुरवठा करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. त्यानुसार या आहारात तेलाचा समावेश होता. मात्र मागील महिन्यापासून लाभार्थ्यांना अचानक तेलाऐवजी साखरेचे वाटप सुरू केल्याने मिळणाऱ्या कडधान्याला फोडणी कशी द्यायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तेलाची कसर साखर कशी भरून काढणार? असा सवाल लाभार्थी करत आहेत.

कोरोना काळात इम्युनिटी वाढविण्याचे प्रयत्न होत असले तरी, शासनपातळीवर ठेकेदारांची मर्जी राखण्यासाठी चक्क पाककृतीमध्येच बदल करून टाकण्यात आला आहे. १५ एप्रिलपासून राज्यात एकच पाककृती लागू केलेल्या आदेशामुळे लाभार्थ्यांना तेलाऐवजी एक किलो साखरेचे वाटप होत आहे.

कोरोना परिस्थितीमुळे एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत कच्चे धान्य व किराणा माल (पूरक पोषण आहार) घरपोहोच वाटप करण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार कडधान्य, डाळ, गहू, तेल, मीठ, मिरची व हळद पावडरचे वाटप केले जात होते. मात्र एप्रिलपासून तेल पुरवठा बंद करून त्याऐवजी साखरेचे वाटप सुरू केले आहे. या प्रकारामुळे लाभार्थी अचंबित होऊन, मिळाले ते स्वीकारत असले तरी, तेल नसल्याची खंत व्यक्त करीत आहेत. तसेच अर्थकारणामुळे ठेकेदारांकडून त्यांना हवे तसे नियम बदल करून योजनेवर डल्ला मारला जात असल्याचे दिसत आहे. कारण पुरवठा होणाऱ्या मालाचा दर्जा यंत्रणेमार्फत तपासल्याचे दिसून आलेले नाही.

--------

लाभार्थ्यांना साखर, मात्र ठेकेदारांचे तोंड गोड

५० दिवसांसाठी मिळणाऱ्या पूरक पोषण आहारात लाभार्थ्यांना खाद्यतेल ५०० ग्रॅम मिळत होते. दिवसाकाठी १० ग्रॅम वाटपाचे हे प्रमाण होते. त्याऐवजी साखर एक किलो वाटप होत असून दिवसाला २० ग्रॅम असे प्रमाण मानून दिले जात आहे. मात्र तेलापासून मिळणाऱ्या उष्मांकाचा आणि साखरेपासून मिळणाऱ्या उष्मांकाचा विचार केलेला दिसत नाही. काही आहारतज्ज्ञांच्यामते एक किलो तेलातून ८८४० कॅलरीज (उष्मांक) मिळतात, तर एक किलो साखरेतून ३८७० कॅलरीज मिळतात. त्यामुळे तेलाला साखरेचा पर्याय शासनाला सुचविणाऱ्या आहारतज्ज्ञांनी पाककृतीमध्ये कसा काय ठरविला? याबद्दल आश्चर्य वाटत आहे. सोयाबीन तेलाचे भाव १६० रुपये किलोपर्यंत आहेत, तर साखर ३६ रुपये किलो आहे. दरातील फरक लक्षात घेत तोटा वाचविण्यासाठी साखर वाटपाचा घाट घालण्यात आल्याचे दिसत आहे.

-------------

पूरक पोषण आहार योजनेचे एकूण लाभार्थी - २,१६,०००

सहा महिने ते ६ वर्षे वयोगटातील लाभार्थी - १,८०,०००

गरोदर महिला लाभार्थी - १९,०००

स्तनदा माता - १७,०००

फोडणी द्यायची कशी?

मला एक मुलगा, एक मुलगी आहे. अंगणवाडीताई फोन करून किंवा व्हाॅट्‌स ॲप ग्रुपवरून माहिती देताच आहार घेऊन येतो. यंदा साखर आली. वरून जसे येते तसे दिले जाते. तेल आले असते तर फोडणीला कामी आले असते. आहारात मटकीची गरज आहे.

- उत्तरेश्वर चादर, पालक, येळंबघाट, ता. बीड

---------

दरवेळेस ताई फोन करून सांगतात. त्यानंतर मालक, सासुबाई किंवा सासरे आहार घेऊन येतात. तो नियमित आणि व्यवस्थित मिळतो. पण तेल मिळाले नाही, साखर आली. तेलाचा उपयोग कडधान्याची उसळ करायला कामी आला असता.

- शिवकन्या चैतन्य कांबळे, लाभार्थी, येळंबघाट, ता. बीड.

-----------

आम्हाला पूरक पोषण आहार मिळतो. तसेच वजनही मोजले जाते. नियमित तपासणीही होते. आहारात तेल आले नाही. साखर मात्र आली. खरं तर तेलच योग्य होते. भाजीला फोडणी देता आली असती. साखरेचा चहाच प्यावा लागणार. - गीता महादेव वायकर, लाभार्थी, आनंदवाडी, ता. बीड.

काय-काय मिळते...

चना, मसूरदाळ, गहू, मिरची, हळद पावडर, मीठ, साखर यातून ३ ते ६ वर्षांच्या लाभार्थीला ५१९ कॅलरीज, तर गराेदर व स्तनदा मातांना ६१४.३१ कॅलरीज मिळतील, अशी पाककृती देण्याचे निर्देश आहेत.

कोरोना काळात पूरक पोषण आहार लाभार्थ्यांना घरपोहोच सुरळीतपणे दिला जात आहे. आहाराची पाककृती एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या माननीय आयुक्तांकडून निर्देशित आहे. तेलाऐवजी साखर मिळाल्याबद्दल अद्याप तक्रारी नाहीत.

- आर. एस. मुंडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालविकास, बीड.

-------------

Web Title: Government austerity; Sugar instead of oil in dietary supplements!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.