उघडीप दिल्याने शेतकरी पुन्हा कामावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:40 IST2021-09-10T04:40:46+5:302021-09-10T04:40:46+5:30

शिरूर कासार : तीन-चार दिवस सतत पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांची दाणादाण उडाली होती. शेतात पाणी साचले. पिके पाण्यात गेली, ...

Farmers re-employed after exposure | उघडीप दिल्याने शेतकरी पुन्हा कामावर

उघडीप दिल्याने शेतकरी पुन्हा कामावर

शिरूर कासार : तीन-चार दिवस सतत पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांची दाणादाण उडाली होती. शेतात पाणी साचले. पिके पाण्यात गेली, तर जनावरांनासुद्धा जागेवरच बांधून ठेवावे लागले होते. संततधार सुरू असल्याने काहीच काम करता येत नव्हते. मात्र, बुधवारपासून पावसाने थोडी विश्रांती घेतली असल्याने शेतकरी कामाला लागला असल्याचे दिसून येत होते. काढून, झाकून ठेवलेली काही पिके उन्हात वाळू घालत होते, तर झालेली बांधाची फुटतूट बुजून टाकत असल्याचे दिसून आले.

डोंगरदऱ्यांत पाणी खळखळून वाहू लागले

शिरूरकासार : कोरड्या दुष्काळाच्या जबड्यातून पावसाने सुटका केली असून, मोठ्या नद्यांना पूर आले, तर डोंगर दऱ्यांतून पाणी खळखळून वाहत असल्याचे विलोभनीय चित्र दिसू लागले आहे, तर जनावरेदेखील डोंगरी चारा खाण्याचा मनमुराद आनंद घेऊ लागले आहेत.

मुक्या जिवांचे बळी घेतले पावसाने

शिरूर कासार : तालुक्यात तीन- चार दिवसांत अतिवृष्टी झाल्याने शेतपिकांचे नुकसान झाले. त्याचप्रमाणे घरांची पडझडीदेखील झाली. यामुळे सिमेंटच्या भिंतींनाही पाझर सुटला, तर अनेक मुक्या जिवांचा पावसामुळे बळी गेला. तालुक्यात वीस शेळ्या, बैल, म्हसीचे वगारू, तर ४०० कोंबड्या दगावल्याची माहिती तहसीलदार श्रीराम बेंडे यांनी दिली. पंचनाम्याचे निर्देश दिले असून, रीतसर अहवाल आल्यानंतर नुकसानभरपाईची कार्यवाही केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सरसकट पंचनामे, नुकसानभरपाई द्यावी

शिरूर कासार : तीन- चार दिवसांत पडलेल्या पावसाने सरसकट शेतीचे नुकसान झाले असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. आता सरकसकट पंचनामे करून त्यांना मदत देण्याची गरज असल्याने शासनाने नुकसानभरपाई देण्याची तातडीने कारवाई करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी तहसीलदार श्रीराम बेंडे यांच्याकडे जिल्हा परिषद सदस्य रामदास बडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

आता गौरी-गणेशपूजनाची लगबग

शिरूर कासार : गणपती व गौरी सण आल्याने विशेषत्वाने महिला वर्गाची मोठी लगबग सुरू झाल्याचे दिसून येते. महालक्ष्मीचा सण म्हणे धाकटी दिवाळीच समजली जाते. गौरी आवाहन, पूजन आणि विसर्जन, असा तीन दिवसांचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यासाठी मखर सजावट, आरास व पंचपक्वान्न नैवेद्याचा सुगंध घराघरांत दरवळत असतो. पावसामुळे या सणालाही एक नवे चैतन्य प्राप्त झाल्याचे बाजारपेठेत दिसून येत आहे.

Web Title: Farmers re-employed after exposure