हंगामाच्या तोंडावर शेतकरी आर्थिक कोंडीत; पुन्हा शेतकरी सावकाराच्या दारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:22 IST2021-06-29T04:22:39+5:302021-06-29T04:22:39+5:30

हंगामाच्या तोंडावर शेतकरी आर्थिक कोंडीत अंबाजोगाई : मागील चार दिवसांपासून तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरणीसाठी लगबग ...

Farmers in financial trouble at the beginning of the season; Again at the door of the farmer lender | हंगामाच्या तोंडावर शेतकरी आर्थिक कोंडीत; पुन्हा शेतकरी सावकाराच्या दारात

हंगामाच्या तोंडावर शेतकरी आर्थिक कोंडीत; पुन्हा शेतकरी सावकाराच्या दारात

हंगामाच्या तोंडावर शेतकरी आर्थिक कोंडीत

अंबाजोगाई : मागील चार दिवसांपासून तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी बियाणे, रासायनिक खते आदींची खरेदी करून ठेवली. काहींनी पेरणी सुरू केली आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांकडे हंगामासाठी पैसाच नाही. ते आर्थिक कोंडीत सापडले आहेत.

परिणामी शेतकरी सावकाराच्या दारात पोहोचत आहेत. संधीचे सोने करण्यासाठी टपून बसलेल्या सावकारांना आता आयतेच सावज मिळू लागले आहे. शासनाच्या कर्जमाफीनंतरही अनेक शेतकऱ्यांची गाडी रुळावर आली नाही. अनेकजण कर्जबाजारीच आहेत. त्यांना बँक कर्ज देत नाही. त्यामुळे नाईलाजाने शेतीच्या बी-बियाणे खरेदीसाठी सावकाराच्या दारात गेल्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही. सावजाच्या शोधात असलेले काही नियमित सावकार शेती गहाण केल्याशिवाय शेतकऱ्यांना पैसे देत नाहीत. तर काही सावकार सरळ विक्रीपत्र करून घेऊन पैसे देतात. ही गोष्ट सावकार व शेतकरी यांच्यातच अनेक दिवस गोपनीय राहते. कालांतराने ही प्रकरणे बाहेर येतात. दरवर्षी शेतकरी आपल्या व्याजासह हिशेब करून सावकाराचे कर्ज मोकळे करतात. ही परंपरा वर्षानुवर्षे चालत आहे. पेरणीसाठी कृषी केंद्राकडून बी-बियाणे व खते या वस्तू नगदी घ्याव्या लागतात. हातात पैसा असला, तर हे सर्व ठीक आहे. मात्र हातात पैसे नसले तर शेतकऱ्यांची फजिती होते.

दागिने गहाण

अनेक शेतकऱ्यांकडे पैसाच नाही, कसेही असले तरी पेरणी योग्यवेळी करावीच लागते. अशा वेळेस वाटेल ती तडजोड करून प्रसंगी घरच्या लक्ष्मीच्या अंगावरचे दागिने गहाण ठेवले जातात. अशी पाळी सध्या तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांवर आली आहे.

बँका कर्ज देईनात

शासनाने शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी आर्थिक मदत व्हावी, या उद्देशाने पीक कर्ज कमी व्याजदराने देण्याची महत्त्वपूर्ण योजना सुरू केली; परंतु बँका शेतकऱ्यांना नियमबाह्य कागदपत्रे मागतात. अनेक शेतकऱ्यांना या कागदपत्रांची पूर्तता करणे शक्य नसते. अनेकांच्या शेतजमिनी अजूनही मृत वारसांच्याच नावे आहेत. तर अनेकांच्या जमिनीची फोड नाही. महसूल प्रशासनाकडे अशी अनेक प्रकरणे पडून आहेत. परिणामी शेतकरी या कागदपत्रांच्या भानगडीत न पडता थेट सावकारांचे घर गाठतो.

Web Title: Farmers in financial trouble at the beginning of the season; Again at the door of the farmer lender

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.