संतोष स्वामी
दिंद्रुड : सततच्या पावसामुळे खरीप पिकांची पुरती वाट लागत असून, कापूस व सोयाबीन ही पिके आता पिवळी पडू लागली आहेत. पावसामुळे मशागतीची कामे करता येत नसल्याने पिकांची दुरवस्था झाली आहे. ही परिस्थिती दिंद्रुड परिसरातील सर्व गावांत तसेच जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी असल्याचे सांगण्यात येते. मृग नक्षत्रातील झालेल्या पेरण्यांनंतर बरेच दिवस पावसाने उघडीप दिली होती. यादरम्यान ज्या शेतक-याला मजूर उपलब्ध झाले, त्यांनी मशागतीची कामे खुरपणी, वकरणी, कोळपणी, खत पेरणी करून घेतली. परंतु बहुतांश शेतक-यांना मजूर वेळेत मिळाले नाही. त्यामुळे आंतरमशागतीची कामे खोळंबली आहेत. अनेकांची कामे अर्धवट राहिली आहेत. कापूस, सोयाबीची पिके अतिवृष्टीने पिवळी पडू लागली आहेत. तसेच या पिकांची वाढ खुंटली आहे.
परिणामी उत्पन्नावर परिणाम हाेण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. अतिवृष्टी अशीच होत राहिली, तर सगळे पिके वाया गेल्या शिवाय राहणार नाहीत. शासन प्रशासनाने पिकांच्या नुकसानीबाबत दखल घेऊन पिकांचे पंचनामे करायला हवेत, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.
लवणाच्या रानाचं झालंय तळं
ज्या शेतक-यांचे शेत लवणात आहे किंवा ज्यांच्या शेतातून वगळ गेली आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग नाही, अशा शेताचं तळ झालं आहे. तलावाचे स्वरूप या शेतजमिनींना आले आहे. यामुळे उगवलेल्या पिकांची पाण्यात नासाडी होत असताना दिसत आहे.
चौकट-
मोठ्या कष्टाने पेरलेले कापूस व सोयाबीन या पिकांचे तात्काळ पंचनामे करून आम्हा शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी व गतवर्षीचा पीकविमा तात्काळ वाटप करून आर्थिक संकटात आधार द्यावा. - पांडुरंग झोडगे, शेतकरी, नाकलगाव
230721\img_20210723_180728_14.jpg