दोन एकर डाळिंबबागेवर शेतकऱ्याने फिरवला नांगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:23 IST2021-06-24T04:23:12+5:302021-06-24T04:23:12+5:30
लोकमत न्युज नेटवर्क धारूर : सहा वर्षांपूर्वी लावलेली दोन एकर डाळिंबबाग जिवापाड जपली. परंतु दरवर्षी कोळी व तेल्या ...

दोन एकर डाळिंबबागेवर शेतकऱ्याने फिरवला नांगर
लोकमत न्युज नेटवर्क
धारूर : सहा वर्षांपूर्वी लावलेली दोन एकर डाळिंबबाग जिवापाड जपली. परंतु दरवर्षी कोळी व तेल्या रोगाचा प्रादुर्भाव होत होता. याबरोबरच यंदा बऱ्यापैकी फळे येऊन कोरोनामुळे डाळिंबाला भाव नव्हता. यामुळे डाळिंबबाग तोट्यातच होती. यास कंटाळून एका शेतकऱ्याने दोन एकर डाळिंबबागेवर ट्रॅक्टर फिरवला.
तालुक्यातील चोरांबा येथील डाळिंब उत्पादक शेतकरी बाळासाहेब चव्हाण यांनी सहा वर्षांपूर्वी डाळिंबबाग लावली होती. ही बाग त्यांनी जोपासली. मोठी केली. त्यास फळेदेखील येऊ लागली; परंतु फळधारणा होताच ते रोगाला बळी पडू लागले. दरवर्षीच कोळी आणि तेल्या रोगाचा बागेवर प्रादुर्भाव होऊ लागला. पर्यायाने उत्पादनावर परिणाम झाला. बाग तोट्यात आली. यंदाही बऱ्यापैकी फळे आली. परंतु कोरोनामुळे त्याला भाव मिळाला नाही. अशा दुहेरी संकटाला सामोरे जावे लागले. पर्यायाने दरवर्षी तोटाच सहन करावा लागला. यामुळे चव्हाण यांनी मंगळवार, बुधवारी या बागांवर चक्क नांगर फिरविला. ट्रॅक्टरच्या साह्याने त्यांनी सहा वर्षे जिवापाड जपलेली दोन एकर डाळिंबबाग उपटून टाकली. यात त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या दोन वर्षांत डाळिंबाला विमा भरपाईदेखील मिळाली नाही. तरी या शेतकऱ्याला पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
===Photopath===
230621\img-20210623-wa0112.jpg
===Caption===
दोन एकर डाळिंब बागेवर नांगर फिरवताना शेतकरी.