कड्यात अतिक्रमणांमुळे बाजारपेठेवर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:22 IST2021-06-21T04:22:23+5:302021-06-21T04:22:23+5:30
कडा : आष्टी तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ व राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे समजल्या जाणाऱ्या कडा गावामध्ये धामणगाव रस्त्यावर अतिक्रमणांमुळे बाजारपेठेचे ...

कड्यात अतिक्रमणांमुळे बाजारपेठेवर परिणाम
कडा : आष्टी तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ व राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे समजल्या जाणाऱ्या कडा गावामध्ये धामणगाव रस्त्यावर अतिक्रमणांमुळे बाजारपेठेचे वाटोळे होऊ लागले आहे. अनेकांनी रस्त्याच्या कडेला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेतच अतिक्रमण केल्यामुळे रस्त्यावर वारंवार अपघात होत असून, अनेकांनी जीव गमावले आहेत तर वाहनांच्या होणाऱ्या गर्दीमुळे सतत ट्रॅफिक जामचा फटका येणाऱ्या-जाणाऱ्यांना बसत आहे. कडा गावातून जात असलेल्या अमरापूर - कर्जत रस्त्याचे काम सुरू गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. मात्र धामणगाव रस्त्यावर अतिक्रमणामुळे रस्त्याचे काम गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. कडा येथे आष्टी तालुक्यातील एकमेव असलेली सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती असून, याच रस्त्यावर बैल बाजार, शेळ्यांचा बाजार, कांदा तसेच धान्याची अडत दुकाने आहेत. यामुळे कड्यामध्ये आष्टी, पाटोदा, कर्जत, जामखेड, पाथर्डी, शिरूर, करमाळा, पैठण इत्यादी तालुक्यामधून कांद्याची आवक आठवड्यातून तीन वेळा होते. त्यामुळे गर्दीचे शहर म्हणून कडा गाव ओळखले जाते. शिवाय कडा येथे बैलांचा व गाईंचा मोठा बाजार भरत असल्याने रविवारी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मात्र धामणगाव रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत रस्त्यावर अनेक दुकानदारांनी अतिक्रमणे केल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. तसेच अरुंद रस्त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.
कडामार्गे अमरापूर, पाथर्डी, मिरजगाव, कर्जत हा महामार्ग जाणार आहे. गावातून जाणाऱ्या या रस्त्यामुळे मार्केट यार्ड ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक या दरम्यान रस्त्याचे सुमारे तीस मीटर एवढे रुंदीकरण होणार आहे.
नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील अमरापूर ते कर्जतदरम्यान हा रस्ता होणार आहे. औरंगाबाद ते बारामतीदरम्यानचा प्रवास या रस्त्याच्या कामामुळे सुखकर होणार आहे. जामखेड सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या नियंत्रणात हे काम सुरू आहे. अमरापूर ते कडादरम्यान रस्ता रुंदीकरणाची तयारी झाली आहे. आता गावातील रस्त्यांची मोजणी झाली आहे. त्यानुसार रस्त्याच्या कडेला असणारी काही बांधकामे मात्र त्यामुळे पाडावी लागणार आहेत. रस्ता सिमेंटचा आणि विस्तारित होणार असल्याने कडा गावासाठी याचा भविष्यात फायदा होणार आहे. त्यामुळे या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या हद्दीत बांधकाम करणाऱ्या दुकानदारांना काही दिवसांपूर्वी जामखेड सार्वजनिक बांधकाम उपविभागामार्फत अतिक्रमण काढून घेण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
आष्टी तालुक्यातील कड्याची बाजारपेठ महत्त्वाची असून, तालुक्यातील शंभराच्या जवळपास गावांचा दैनंदिन संपर्क असतो. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती असल्याने नेहमी वर्दळ असते. त्यामुळे अतिक्रमण काढल्याने शहराच्या वैभवात भर पडेल असे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी सांगितले.
===Photopath===
200621\20bed_7_20062021_14.jpg