मरण झाले स्वस्त, महामारीत कोरोनाने, नंतर रस्ते अपघातांमध्ये वाढले मृत्यू - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:22 IST2021-06-28T04:22:38+5:302021-06-28T04:22:38+5:30
बीड : ‘अति घाई संकटात नेई’, नियम पाळा अपघात टाळा यासह इतर अनेक सूचना महामार्गावर अनेक ठिकाणी लावलेल्या असतात; ...

मरण झाले स्वस्त, महामारीत कोरोनाने, नंतर रस्ते अपघातांमध्ये वाढले मृत्यू - A
बीड : ‘अति घाई संकटात नेई’, नियम पाळा अपघात टाळा यासह इतर अनेक सूचना महामार्गावर अनेक ठिकाणी लावलेल्या असतात; मात्र त्यानंतरही अपघातांची संख्या कमी होताना दिसत नाही. मरण स्वस्त झाल्याचे चित्र असून, कोरोना महामारीनंतर अपघातातील मृत्यूचे आकडे हे चिंता वाढवणारे आहेत.
रस्ते अपघातात वर्षाकाठी जिल्ह्यात सरासरी ३५० जणांचा मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये बहुतांश वेळा वाहनचालकाचा दोष आढळून आलेला आहे. तर काहीजणांची चूक नसतानादेखील इतरांच्या चुकीमुळे त्यांना जीव गमवावा लागल्याचे प्रकार देखील घडलेले आहेत. बीड जिल्ह्यातील रस्ते अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वाहनचालकांनी सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. दरवर्षी अपघातातील मृत्यूमुळे अनेक कुटुंबं उघड्यावर पडतात. त्यामुळे वाहने चालवताना वेग मर्यादा, मद्यपान करून वाहन चालवणे यासह इतर वाहनांचे सर्व नियम पाळणे गरजेचे झाले आहे. २०२० या वर्षात ३२९ जणांनी आपले प्राण रस्ते अपघातात गमवले आहेत. तर २०२१ मे अखेरपर्यंत १५९ जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. ही चिंतेची बाब असून, दुचाकीस्वारांनी हेल्मेटसक्तीने वापरणे गरजेचे आहे. प्रवासादरम्यान आपल्यासोबत इतरांची काळजी घेणे गरजेचे आहे. जेणेकरून अपघात होणार नाहीत. तसेच प्रशासनाकडून घालून दिलेल्या नियमांचे पालन केल्यास अपघातांच्या प्रमाणात घट होईल व अपघाती मृत्यूसत्र कमी होण्यास मदत होईल. वाहतूक शाखेकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचे पालन करून अपघात टाळावेत असे आवाहन वाहतूक शाखा बीडच्या वतीने करण्यात आले आहे.
वेळ मौल्यवान, पण जीवन अमूल्य
सर्वांसाठी या काळात वेळ महत्त्वाचा आहे. मात्र, वाहनांवर नियंत्रण राहील याच पद्धतीने ते चालवणे गरजेचे आहे. अन्यथा आपल्यासोबत आपण इतरांचा देखील जीव धोक्यात घालतो. असे करणे चुकीचे असून, सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करावे.
कुलदिप करपे
जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे अपघाताला निमंत्रण देण्यात आल्यासारखे असून, नागरिकांनी स्वत:ची काळजी स्वत: घेणे गरजेचे आहे. रस्त्याचे काम सुरु असताना ते व्यवस्थित करून घेण्याची देखील नागरिकांचीच जबाबदारी आहे. तसेच विमा कवच असणे देखील सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
राहुल वायकर
वर्ष अपघात जखमी मृत्यू
२०१८ १६४ ३८३ ३३८
२०१९ ५९५ ४२० ३५३
२०२० ५५५ ३६५ ३२९
मे २०२१ २८२ १८० १५९
लॉकडाऊनमध्ये देखील झाले अपघात....
लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यातील अपघाताची संख्या कमी झाली. त्यामुळे रुग्णालयात अपघातातून भरती होणाऱ्यांचे प्रमाण काही ठिकाणी घटले आहे. लॉकडाऊन असताना देखील अपघात झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे २०२० साली देखील ५५५ अपघातांची नोंद झाली आहे.
जिल्हा अनलॉक झाल्यानंतर अपघाताची संख्या वाढल्याचे चित्र मागील व यावर्षी देखील पाहायला मिळत आहे.
पायी चालणाऱ्या व्यक्तीला धोका
अपघात केवळ वाहनांचेच होतात असे नाही. पायवाट चालणाऱ्या व्यक्तीलादेखील वाहनांची धडक बसून मोठे अपघात होते तर काहींना प्राण देखील गमवावे लागतात. तर काही ठिकाणी अपघात झाल्यानंतर मदत न करता पळ काढण्याची प्रवृत्ती वाढत असल्यामुळे अपघातग्रस्त नागरिकांचा उपचाराविना देखील मृत्यू होत आहेत.
मृतांमध्ये सर्वाधिक तरुणांचा समावेश
अपघातात होणाऱ्या मृत्यूमध्ये सर्वाधिक प्रमाण हे तरुणांचे राहिले आहे. भरधाव वेगात तरुण गाडी चालवितात. त्यांच्या कानाला हेडफोन लावलेले असतात. शिवाय गतिरोधकावर देखील वाहनांची स्पीड कमी होत नाही.काहीजण मद्यपान करून गाडी चालवतात त्यामुळे अपघातात सर्वाधिक तरुणांचा समावेश असल्याचे चित्र आहे.
याठिकाणी वाहने हळू चालवा
कमी वेळेत जास्तीत जास्त अंतर पार करता यावे. म्हणून वाहनांची गती सर्वाधिक वेळेस वाढते. त्यामुळे बाह्यवळणावर वाहनांचे नियंत्रण राहत नाही. त्यामुळे अपघात होतात, तसेच इतर वाहनचालकांसोबत घाट किंवा महामार्गावर स्पर्धा करणे हे देखील धोकादायक आहे.