पेठेत पथदिवे सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:23 IST2021-07-04T04:23:03+5:302021-07-04T04:23:03+5:30
बीड : शहरातील पेठ बीड भागातील पथदिवे बंद असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अंधाराचा फायदा घेत ...

पेठेत पथदिवे सुरू करण्याची मागणी
बीड : शहरातील पेठ बीड भागातील पथदिवे बंद असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अंधाराचा फायदा घेत भुरटे चोरही सक्रिय झाले आहेत. या भागात मोजक्या ठिकाणी पथदिवे सुरू आहेत. मात्र तेल गल्ली, महावीर चौक, बुरूड गल्ली, साळ गल्ली तसेच विठ्ठल मंदिरालगतचे पथदिवे बंद असून, ते सुरू करण्याची मागणी होत आहे.
कापूस, तूर लागवडीची लगबग
शिरूर कासार : सध्या तालुक्यात पाऊस झाल्याने कापूस, तूर लागवडीची लगबग सुरू आहे. रेघा टाकून बी टोकन पद्धतीने शेतकरी लागवड करीत आहेत. बाजरी, मुगाची पेरणीही शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. एकंदरीत शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त दिसत आहेत.
राडी-मुडेगाव रस्त्यावर खड्डे
अंबाजोगाई : आठ महिन्यांपूर्वीच राडी ते मुडेगाव या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण केले होते. शासनाने लाखो रुपये खर्च करून या रस्त्याचे डांबरीकरण केले. मात्र, काम करणाऱ्या कंत्राटदाराने या मुख्य रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केल्याने या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. हा रस्ता कंत्राटदारांच्या माध्यमातून पुन्हा करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
सुरळीत पाणीपुरवठ्याची मागणी
बीड : नगर परिषदेकडून शहराला अनियमित पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहराच्या काही भागात तीन दिवसांआड, तर काही भागांत बारा ते पंधरा दिवसांआड आणि तेही तीन ते चार तास याप्रमाणे पाणीपुरवठा होतो. शहरात होणारा पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.