अंबाजोगाई : येथील राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने राज्यात अतिवृष्टीमुळे पिंकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे राज्य सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी येथील राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व रासपचे महासचिव बाळासाहेब दोडतले यांनी केले.
यावेळी उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, राज्यात परतीच्या पावसामुळे बहुतांश पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे उत्पन्नाची कसलीही शाश्वती नसून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकार गंभीर नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई जमा करावी. या मागण्यांसाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय पक्ष समाज पक्षाचे महासचिव बालासाहेब दोडतले, जिल्हा अध्यक्ष दत्ता काळे, तालुका अध्यक्ष राहुल सोन्नर, नामदेव खोडवे, अविनाश जानकर, बाळा गायके, बाबा गडदे,रुपेश परदेशी, मुन्ना गडदे, सलीम चौधरी, बाबा गाढवे, शेषराव मस्के यांच्यासह आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला.