साध्या अर्जावर होणार पीक कर्जाचे नूतनीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:24 IST2021-06-25T04:24:24+5:302021-06-25T04:24:24+5:30
बीड : शेतकऱ्यांनी एका पानाचा अर्ज दिला तरी त्यांच्या पीक कर्जाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. बीड जिल्ह्याला खरीप हंगामात ...

साध्या अर्जावर होणार पीक कर्जाचे नूतनीकरण
बीड : शेतकऱ्यांनी एका पानाचा अर्ज दिला तरी त्यांच्या पीक कर्जाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. बीड जिल्ह्याला खरीप हंगामात १६०० कोटी रुपये पीक कर्जाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. शेतकरी गरजेनुसार पीक कर्जाची मागणी करत असून आलेल्या प्रस्तावांची छाननी करून पीक कर्ज वाटपाला गती देण्यात आली आहे. तर दुसरीकडे पीक कर्जाचे नवे-जुने करण्यासाठी तसेच पात्र शेतकऱ्यांना वाढीव कर्ज उपलब्ध करण्यासाठी एसबीआयने मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत २३ ते ३० जूनदरम्यान पीक कर्ज नूतनीकरण मेळाव्याचे आयोजन केले आहे. २३ ते ३० जूनदरम्यान बँकेचे अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी त्यांच्या अधिपत्याखाली दत्तक गावांच्या सरपंचांना भेट देणार आहेत. नूतनीकरणास योग्य असलेल्या बँकेच्या पीक कर्ज खातेदार शेतकऱ्यांची यादी देऊन संबंधित गावातील शेतकऱ्यास पीक कर्जाचे नूतनीकरण करण्यासाठी प्रोत्साहन देणार आहेत. यासाठी शेतकरी फक्त एक पानी अर्ज बँकेत दाखल करून दहा ते वीस टक्क्यांपर्यंत वाढीव पीक कर्जाचा लाभ घेऊ शकतील. या पीक कर्जाचे नूतनीकरण शेतकऱ्यांना एसबीआय योनो ॲपवरून देखील करता येणार आहे. तसेच तीन लाख रुपये कर्ज मर्यादेपर्यंतच्या कर्जात डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना व केंद्र सरकारमार्फत प्राप्त होणाऱ्या निर्देशानुसार व्याजात भरघोस सवलतीचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. अटी आणि शर्तींचे पालन करून या योजनेचा ३० जूनपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, एसबीआयचे सहायक महाप्रबंधक नंदकिशोर भोसले, नोडल जिल्हा कृषी अधिकारी एसबीआयचे अमोल गायके, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्रीधर कदम यांनी केले आहे.