कोरोना नियमांमुळे मद्यपी वाहनचालकांवरील कारवाया घटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:22 IST2021-07-03T04:22:02+5:302021-07-03T04:22:02+5:30

बीड : राज्य महामार्ग रस्ते विकसित करण्याच्या दृष्टीने बांधकाम विभाग प्रयत्न करत आहेत. त्याचसोबत अपघात टाळण्यासाठी विविध उपाययोजना केल्या ...

Corona regulations reduce actions against drunk drivers | कोरोना नियमांमुळे मद्यपी वाहनचालकांवरील कारवाया घटल्या

कोरोना नियमांमुळे मद्यपी वाहनचालकांवरील कारवाया घटल्या

बीड : राज्य महामार्ग रस्ते विकसित करण्याच्या दृष्टीने बांधकाम विभाग प्रयत्न करत आहेत. त्याचसोबत अपघात टाळण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, तरीदेखील विविध कारणास्तव होणाऱ्या अपघातांची संख्या कमी होताना दिसत नाही. त्यातच सर्वाधिक अपघात हे दारू पिऊन वाहन चालवल्यामुळे झाल्याचे वेळोवेळी समोर आलेले आहे. कोरोना काळात ब्रिथ अल्कोहोल ॲनालायझरचा वापर बंद केल्यामुळे मागील सहा महिन्यांत फक्त ८० कारवाया करण्यात आल्या आहेत.

वाहनचालकाने दारू पिऊन वाहन चालवू नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून‘ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह’च्या कारवाया केल्या जातात. वाहतूक शाखा तसेच महामार्ग पोलीस व पोलीस ठाणे हद्दीत या कारवाया केल्या जातात. परंतु, कोरोना महामारी सुरू झाल्यापासून एकमेकांपासून सामाजिक अंतर पाळण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. तसेच चालक दारू पिलेला आहे की नाही, यासाठी वापरण्यात येणाऱ्या ब्रिथ अल्कोहल ॲनालायझर वापरावर कोरोनामुळे बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या कारवायांमध्ये मोठी घट झाल्याचे चित्र आहे.

दरम्यान, २०१९ या वर्षात १ हजारपेक्षा जास्त ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह’ च्या कारवाया करण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर २०२० या वर्षात जवळपास ३०३ कारवाया करण्यात आल्या आहेत. तर, मागील सहा महिन्यांत फक्त ८० कारवाया झाल्या आहेत. कोरोनाच्या नियमांमुळे मद्यपी वाहनचालक बिनधास्त फिरत आहेत. तरीदेखील संशय आल्यावर पोलिसांकडून कारवाया केल्या जात आहेत.

ब्रिथ ॲनालायझरचा वापर बंद

कोरोना संसर्गजन्य रोग आहे. ब्रिथ ॲनालायझरचा वापर केल्यास त्याचा प्रसार होण्याची शक्यता होती. हा धोका ओळखून ब्रिथ ॲनालायझरचा वापर न करण्याच्या सूनचा वाहतूक शाखेला देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे फक्त संशय आल्यानंतरच पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.

पोलीस प्रशासनाचे आवाहन

राज्य महामार्गावर वाहन चालविताना काहीजण मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असतात. अशा वाहनचालकांमुळे राज्य मार्गावर मोठ्याप्रमाणात अपघात होतात. या अपघाताला नियंत्रित करण्यासाठी वाहतूक शाखा व महामार्ग पोलीस ठिकठिकाणी तपासणी करून कारवाया करत आहेत. एखादा चालक मद्यधुंद अवस्थेत आढळला तर, त्याच्यावर कारवाई करण्यात येते.

२०१९ या वर्षात सर्वाधिक कारवाया करण्यात आल्या होत्या, तर, २०२० व २०२१ या वर्षात कोरोनाच्या नियमांमुळे कारवाया कमी झाल्या आहेत. दरम्यान, वाहनचालकांनी स्वत:च्या व इतरांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये, यासाठी सुरक्षित वाहन चालवावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

वाहतूक शाखा अपघात रोखण्यासाठी व वाहनचालकांना शिस्त लागावी, यासाठी विविध उपाययोजना करत आहे. कोरोना काळात मद्यधुंद वाहनचालकांवरील कारवाया घटल्या आहेत. मात्र, तरीदेखील वाहतूक शाखेकडून नशेत असलेल्या चालकांवर अपघात टाळण्यासाठी त्वरित कारवाया करण्यात आल्या आहेत. तसेच दंडात्मक कारवाई करून गुन्हेदेखील दाखल करण्यात आले आहेत. नागरिकांनी सुरक्षित वाहन चालवावे, असे आवाहन वेळोवेळी पोलीस प्रशासनाकडून केले जाते.

कैलास भारती, वाहतूक शाखा प्रमुख, बीड

२०२१ मध्ये मद्यपींवर झालेली कारवाई (जूनअखेर)

जानेवारी ३३

फेब्रुवारी ०४

मार्च ०४

एप्रिल ०९

मे २२

जून ०७

Web Title: Corona regulations reduce actions against drunk drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.