दुसऱ्यावर्षीही आषाढी वारीवर कोरोनाचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:21 IST2021-07-03T04:21:48+5:302021-07-03T04:21:48+5:30
वारकऱ्यांचे आगमन होणार नसल्याने पालखी मार्गही सामसूम अविनाश मुडेगावकर अंबाजोगाई : अंबाजोगाईमार्गे दरवर्षी शंभर ते सव्वाशे ...

दुसऱ्यावर्षीही आषाढी वारीवर कोरोनाचे संकट
वारकऱ्यांचे आगमन होणार नसल्याने पालखी मार्गही सामसूम
अविनाश मुडेगावकर
अंबाजोगाई : अंबाजोगाईमार्गे दरवर्षी शंभर ते सव्वाशे लहान-मोठ्या दिंड्या पंढरपूरकडे पायी जातात. परंतु मागील वर्षीप्रमाणे कोरोनामुळे यंदाही या दिंड्यांचे दर्शन अंबाजोगाईकरांना होणार नसल्याने हा भक्तीचा महिना सुनासुना वाटत आहे.
यावर्षी समाधानकारक पाऊस पडला. पेरण्याही उरकल्या. इतरवेळी कधी पेरण्या करून, नाही तर घरातील इतर सदस्यांवर पेरणीची जबाबदारी टाकून आषाढी वारीनिमित्त नित्यनियमाने अनेक वारकरी पंढरपूर गाठतात. दरवर्षी पंढरपूरला पायी वारीला जाणाऱ्या विविध दिंड्या अंबाजोगाईमार्गेच जातात. आषाढी एकादशीच्या जवळपास एक महिना आधी या दिंड्या त्यांच्या मूळ गावातून निघतात. अंबाजोगाई येथे पोहोचल्यानंतर पुढे आठ ते दहा दिवसांत पंढरपूर गाठायचे, असे त्यांचे नियोजन असते. मागीलवर्षी दिंड्यांची ही वर्षानुवर्षे चालणारी परंपरा कोरोनामुळे खंडित झाली आहे.
पालखी मार्ग तयार झाला; मात्र वारकरीच नाहीत!
विदर्भ व नांदेड, हिंगोली जिल्ह्यांतून अनेक दिंड्या निघतात. मात्र नागरिकांना मोठी उत्सुकता असते, ती संत श्री गजानन महाराज यांच्या दिंडीची. ही दिंडी परिसरातील भाविकांचे मोठे श्रध्दास्थान बनले आहे. हरिनामात तल्लीन असलेल्या वारकऱ्यांनी पूर्वी या मार्गावरील चिखल तुडवीत, खड्ड्यांचा अडथळा पार करीत अनेक वर्षे पंढरी गाठली. मात्र आता हा रस्ता चौपदरीकरणामुळे व्यवस्थित झाला आहे. परंतु कोरोना प्रादुर्भावामुळे पंढरपूरमध्ये ''नो एन्ट्री'' असल्याने वारकरी वारीसाठी निघालेच नाहीत. त्यामुळे पालखी मार्ग झाला; पण वारकरीच नाहीत, असे चित्र सध्या दिसत आहे. सलग दोन वर्षे दिंडीची परंपरा कोरोना प्रादुर्भावामुळे खंडित झाली. यावर्षीही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे व तिसऱ्या लाटेच्या भीतीने शासनाने वारीच रद्द केल्याने सलग दुसऱ्यावर्षी वारकरी आणि विठ्ठल यांची भेट होणार नाही. दरवर्षी आषाढी एकादशीसाठी अंबाजोगाईमार्गे जवळपास शंभर ते सव्वाशे लहान-मोठ्या दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. यातील अनेक दिंड्यांना मोठी परंपरा लाभलेली आहे.
अंबाजोगाई येथील रहिवाशांनी विविध दिंडीतील वारकऱ्यांना अन्नदानाची परंपरा पिढ्यानपिपिढ्या जोपासली आहे. दरवर्षी आषाढी वारीसाठी जाणाऱ्या सर्वच दिंड्यातील वारकऱ्यांची जेवणाची व्यवस्था येथे होते. यंदाही ही परंपरा खंडित झाल्याने काहीतरी राहून गेले, अशी रुखरुख झाल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
शेगाव संस्थानची दिंडी ही आषाढी वारीसाठी जाणारी सर्वात जास्त वारकरी असलेली दिंडी असते. दरवर्षी अंबाजोगाई येथे मुक्कामी असलेल्या या दिंडीतील संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे हजारो भक्त दर्शन घेतात. मागील आणि यावर्षीही दिंड्यांना परवानगी नसल्याने महाराजांचे दर्शन होणार नसल्याची खंत भाविकांना आहे. ज्ञानदेव, तुकारामाचा गजर करीत भक्तीत तल्लीन होऊन निघालेल्या या वारकऱ्यांमुळे अंबाजोगाई शहरात तसेच या मार्गावरील गावातही भक्तिमय वातावरण असते. अनेक ठिकाणी मुक्काम, भोजन व पहाटे भजन-कीर्तन करून हे वारकरी पुढे प्रस्थान करतात. यावर्षीही तो सत्संग घडणार नसल्याने भाविकांनाही चुकल्यासारखे वाटणार आहे.