कोरोनाने अन्नदानाचे स्थळ, लाभार्थीही बदलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:25 IST2021-06-02T04:25:46+5:302021-06-02T04:25:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिरूर कासार : संपूर्ण जगाचे जीवनमान अस्थिर करून टाकलेल्या कोरोनाने शहरी व ग्रामीण भागातही बदल घडविले ...

कोरोनाने अन्नदानाचे स्थळ, लाभार्थीही बदलले
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरूर कासार : संपूर्ण जगाचे जीवनमान अस्थिर करून टाकलेल्या कोरोनाने शहरी व ग्रामीण भागातही बदल घडविले आहेत. गेल्या वर्षभरात हे बदल घरात बसूनच स्वीकारावे लागले. मंदिर, प्रार्थनास्थळांचे दरवाजे बंद झाले. एवढेच नव्हे, तर अन्नदानाचे स्थळ आणि लाभार्थीही बदलले. देवस्थानांच्या अन्नदानाला काही काळ स्थगिती मिळाली आहे.
भारत देश विविध परंपरेने, संस्कृतीने नटलेला आहे. शेकडोहून अधिक वर्षाच्याही परंपरा जशाच तशा सांभाळल्या जात होत्या. त्यात अन्नदानाला विशेष महत्त्व देत. दानात द्रव्यदान, भूदान, गोदान, सुवर्णदान, वस्त्रदान, कन्यादान असे दान महत्त्वपूर्ण मानले जात. असे असले, तरी आता नव्या दानात रक्तदान, नेत्रदान, किडनी दान, अवयवदान, देहदान, प्लाझ्मा दान अशा नव्या दानांची भर पडली.
रीतिरिवाज स्थगित ठेवले गेले. अन्नदानाला सर्वत्र मान्यता होती. लग्नात सगेसोयरे, मित्रपरिवार आप्तेष्ट यांच्यासह अगदी अख्खे गाव पंगतीत बसायचे. श्रीमंताचे लग्न असले, तर विचारूच नका. तालुका जिल्हा बाहेरून येणारे वऱ्हाडी भोजन पंक्तीत बसायचे. सप्ताह, जयंती, पुण्यतिथीसारख्या धार्मिक कार्यक्रमात तर लाखांवर महापंगती बसायच्या. तीर्थक्षेत्री अन्नदान होत होते. मात्र, आता हे सगळे थांबले असले, तरी अन्नदानाची परंपरा चालूच आहे. बदल झाला, तो ठिकाणांचा आणि लाभार्थ्यांचा.
जिल्हाभर शासनाच्या कोविड सेंटरशिवाय मोफत सेंटर सुरू झाले. त्यात शेकडो बाधीत रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांना नाश्ता, भोजन, दान देण्याची प्रथा सुरू झाली. या दानात सर्वधर्मीय माणूस म्हणून आधार देण्यासाठी अन्नदान यज्ञात आपली जमेल तेवढी समिधा टाकत आहे. कोरोनामुळे मंदिर, प्रार्थनास्थळावर सुरू असलेल्या अन्नदानाने कोरोना सेंटर गाठले. सगेसोयरे व भाविकांच्या जागी बाधित रुग्णांना अन्नदान केले जात असल्याचे चित्र आहे.
....
कोरोनाचा प्रसार होऊ नये, म्हणून मंदिरे बंद होती. यामुळे धार्मिक उत्सव बंद ठेवणे क्रमप्राप्त होते. निराधार, गरजू रुग्णांना या काळात आधार देण्याची खरी गरज आहे. ते काम अन्नदानाच्या माध्यमातून होत आहे, ही चांगली गोष्ट आहे. अन्नदानाचे स्थळ बदलले असले, तरी त्यातून मिळणारे समाधान तेवढेच मोठे आहे.
- स्वामी विवेकानंद शास्त्री, महंत, सिद्धेश्वर देवस्थान, शिरुर.