माजलगाव (बीड) : राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार येऊन तीन वर्षे झाली असून त्यांनी सामान्य जनता व शेतक-यांना फसवले आहे, सरकारनी केवळ घोषणाबाजी केली आहे असा आरोप करत कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शिवाजी चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी करत गाजर वाटप आंदोलन करण्यात आले.
या अनोख्या आंदोलनाबाबत बोलताना कॉंग्रेस तालुका अध्यक्ष नारायण होके पाटील म्हणाले कि, फडणवीस सरकार सर्वच स्तरावर अपयशी ठरले आहे. सरकारने तीन वर्षात शेतकरी, मजुर, कामकार, व्यापारी व बेरोजगारांना फसवले असून 'मी लाभार्थी' या खोट्या जाहिराती करण्यात येत आहेत. यामुळे सरकारमधील कोणताही मंत्री माजलगावात आल्यास त्यांनाही गाजर देण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यानंतर आंदोलकांनी तहसिलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.
आंदोलनास राष्ट्रवादीचे नप गटनेते विजय अलझेंडे, रिपाई एकतावादीचे विजय साळवे, मानवी हक्क अभियानचे राजेश घोडेर, रंगनाथ निकम, साजेद पठाण यांनी पांठीबा दिला. तसेच आंदोलनात शहराध्यक्ष शेख आहेमंद, सरपंच विनोद सुरवसे, गणेश चोरमले, अशोक ढगे, आतीक पठाण, शब्बीर पठाण, मावली राऊत, किरण ढगे, बाळासाहेब पौळ, शरद गोपाळ, दयानंद डुकरे, गणेश घेणे, सलमान इनामदार, श्रीनिवास शेळके आदींची उपस्थिती होती.