जळालेल्या ‘त्या’ कागदपत्रांचे आजही चटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:41 IST2021-07-07T04:41:42+5:302021-07-07T04:41:42+5:30

अविनाश मुडेगावकर लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : ‘सरकारी काम अन् सहा महिने थांब’ अशीच अवस्था अंबाजोगाई तालुक्यातील ...

Clicks on burned documents | जळालेल्या ‘त्या’ कागदपत्रांचे आजही चटके

जळालेल्या ‘त्या’ कागदपत्रांचे आजही चटके

अविनाश मुडेगावकर

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : ‘सरकारी काम अन् सहा महिने थांब’ अशीच अवस्था अंबाजोगाई तालुक्यातील नागरिकांची झाली आहे. दहा वर्षांपूर्वी अंबाजोगाई तहसील कार्यालयाच्या अभिलेख कक्षाला आग लागल्याने सर्वच महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली होती. जुने पुरावे उपलब्ध होत नसल्याने कुठलीही नवीन कागदपत्रे मिळत नाहीत. परिणामी त्या आगीचे चटके आजही निमूटपणे अनेकांना सहन करावे लागत आहेत.

दहा वर्षांपूर्वी एप्रिल २०११ मध्ये अंबाजोगाई तहसील कार्यालयाच्या अभिलेख कक्षाला अचानक आग लागली. या आगीत तहसील कार्यालयातील ८० वर्षांपूर्वीचे जुने रेकॉर्ड जळून खाक झाले. यात प्रामुख्याने शेत जमिनीची कागदपत्रे, राष्ट्रीयत्वाचे उतारे, जात पडताळणी कागदपत्रे, दावे-प्रतिदावे, निझामकालीन कागदपत्रे, संग्रहित दस्तावेज अशी सर्व महत्त्वपूर्ण कागदपत्रे आगीत भस्मसात झाली. याचा मोठा फटका अंबाजोगाई तालुक्यातील रहिवाशांना बसला आहे. तहसील कार्यालयात कोणतीही कागदपत्रे काढण्यासाठी गेल्यानंतर त्याला जुने पुरावे सादर करावे लागतात. हे जुने पुरावेच उपलब्ध होत नसल्याने नवीन प्रमाणपत्र काढणे जिकिरीचे काम ठरते. शालेय विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र काढणे महत्त्वपूर्ण ठरते. यासाठी जुन्या कागदपत्रांचा आधार घ्यायचा कसा, हा मोठा संभ्रम निर्माण होतो, तर शेतजमिनीची नावे नोंदविणे, फेरफार घेणे यासाठीही मोठ्या अडचणी येतात. न्यायालयीन कामकाजासाठी दाव्या-प्रतिदाव्यांना अनेक महत्त्वाची कागदपत्रे उपलब्ध होत नसल्याने अनेक दावे-प्रतिदावे रखडलेल्या स्थितीत आहेत.

सध्या शालेय विद्यार्थ्यांची विविध प्रमाणपत्रांसाठी धावपळ सुरू आहे. ही प्रमाणपत्रे काढण्यासाठी जुने दस्तावेज उपलब्ध होत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. इतकेच नाही तर लाभधारकांना मिळालेल्या सिलिंगच्या जमिनी, इनामी जमिनी, कुळाच्या जमिनी, त्यावरील नावे अशी सगळी कागदपत्रे उपलब्ध होत नसल्याने अनेकांना स्वत:ची जमीन असूनही ती नावावर नसल्याने अधांतरी राहण्याची वेळ आली आहे. तहसील कार्यालयातूनही अशा कागदपत्रांची मागणी केल्यास तो दस्तावेज जळीत आहे, असे प्रमाणपत्र दिले जात असल्याने आता करायचे काय, असा मोठा पेच नागरिकांसमोर उभा राहिला आहे.

....

कागदपत्रे उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू

अभिलेख कक्षात आग लागल्याने अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्रे जळाली आहेत. त्या कागदपत्रांची उपलब्धता करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. जुने दावे-प्रतिदावे, न्यायालयीन प्रक्रियेत सादर केलेली अनेक कागदपत्रे उपलब्ध होऊ शकतात. या माध्यमातून जुन्या दस्तावेजांचे एकत्रीकरण सुरू असल्याचे तहसीलदार विपिन पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

-----------

Web Title: Clicks on burned documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.