सावधान... कानांना बुरशी, बॅक्टेरियाचा धोका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:23 IST2021-06-26T04:23:27+5:302021-06-26T04:23:27+5:30
अविनाश मुडेगावकर लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : कोरोना विषाणू संसर्गाचे संकट आता ओसरू लागले आहे. बीड जिल्ह्यात ...

सावधान... कानांना बुरशी, बॅक्टेरियाचा धोका !
अविनाश मुडेगावकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : कोरोना विषाणू संसर्गाचे संकट आता ओसरू लागले आहे. बीड जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव मोठा ठरला. त्यामुळे जिल्हावासीयांना या आजारातून बाहेर पडण्यासाठी उशीर लागला. असे असले तरी आता कानांना बुरशी व बॅक्टेरियाचा धोका वाढला आहे. हा आजार पुढे आल्याने कानांची योग्य प्रकारे काळजी घेणे, हाच त्यावरील सक्षम पर्याय असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
कानांचे आजार प्रामुख्याने दोन प्रकारचे आहेत. त्यात सर्दी होऊन कान दुखणे आणि दुसरा प्रकार म्हणजे कानाच्या पडद्याला छिद्र असणे किंवा कानाच्या मागच्या हाडामध्ये ‘इन्फेक्शन’ होणे. यातील पहिल्या प्रकारात साध्या उपचारानंतरही रुग्ण ठणठणीत बरे होतात. मात्र, दुसऱ्या प्रकारातील रुग्णांना नियमित काळजी घ्यावी लागते. कान सतत ओले राहात असतील, तर बुरशी निर्माण होऊ शकते. त्यामुळे कान नियमित कोरडे ठेवायला हवेत. हेडफोनचा कामापुरताच वापर करायला हवा. कान टोकदार वस्तूने कधीच कोरू नये, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.
....
काय घ्याल काळजी?
शरीरावरील अत्यंत महत्त्वाच्या अवयवांपैकी एक असलेले कान सुरक्षित राहाणे गरजेचे आहे. यामुळे प्रत्येकाने कानांची काळजी घ्यायला हवी. पावसात बाहेर पडत असाल तर दोन्ही कान व्यवस्थितरित्या झाकून घ्या. आंघोळ करताना कानांमध्ये पाणी जाऊ नये, यासाठी कानात कापसांचे बोळे टाका.
कानातील मळ जबड्याच्या हालचालींमुळे आपसूकच निघून जातो. त्यामुळे टोकदार वस्तू किंवा गाडीच्या चाव्यांनी कान कोरणे तत्काळ बंद करायला हवे.
....
पावसाळ्यात ओलाव्यामुळे धोका
१) पावसाळ्यात भिजल्यानंतर कान बराचवेळ तसेच ओले राहिल्यास धोका उद्भवू शकतो. त्यामुळे सर्वात आधी कान कपड्याने कोरडे करून घ्यायला हवे. पावसात भिजल्यानंतर सर्दी झाल्यास त्याचा थेट परिणाम कानदुखीवरही होऊ शकतो.
२) कानांचा जुना आजार आधीच जडलेला असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. कानांचे विकार असलेल्यांनी पावसात भिजूच नये किंवा कान व्यवस्थितरित्या झाकूनच बाहेर पडावे. पाऊस आणि थंडीमुळे कान दुखण्याचा प्रकार बळावू शकतो.
३) कान दुखू लागल्यास किंवा त्यातून पाणी येत असल्यास तत्काळ उपचार घेणे गरजेचे आहे. चुकीच्या पद्धतीने घरगुती उपचार करून धोका बळावतो. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहाणे आवश्यक आहे.
...
डॉक्टरांच्या प्रतिक्रिया
विशेषत: पावसाळ्यात काळजी न घेतल्यास कानांचे जुने आजार बळावतात. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहाणे गरजेचे आहे. कानात होणारा मळ हा कानांच्या संरक्षणासाठी महत्त्वाची बाब आहे. बोलताना जबड्याची हालचाल झाल्यानंतर तो आपसूकच कानातून निघून जातो. त्यासाठी कान कोरण्याची गरज नाही. कानात तेल कधीच टाकू नये किंवा कानात पाणी मारू नये.
- डॉ. सुधीर भिसे, कान-नाक-घसा तज्ज्ञ, स्वाराती रुग्णालय, अंबाजोगाई.
....
कोरोना किंवा म्युकरमायकोसिसचा कानांच्या आजाराशी कुठलाही संबंध नाही. मात्र, कानांच्या आजारांकडे दुर्लक्ष करणे हानीकारक ठरू शकते. कोण काय बोलतो, हे ऐकण्याकरिता कान सुदृढ असणे आवश्यक आहे. त्यामुळे कान नियमित स्वच्छ ठेवायला हवेत. तेल टाकून किंवा टोकदार वस्तूने कान कोरल्याने दिलासा मिळण्याऐवजी धोका वाढू शकतो, हे लक्षात ठेवावे.
- डॉ. प्रशांत देशपांडे, कान-नाक-घसा विभाग प्रमुख, स्वाराती रुग्णालय, अंबाजोगाई.
...