बीड जिल्ह्यात कापसावर पुन्हा बोंडअळीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 23:49 IST2019-11-22T23:48:25+5:302019-11-22T23:49:03+5:30

जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून कापूस पिकांवर बोंडअळीचे संकट घोंगावत आहे. यावर्षी देखील कापूस पिकावर बोंडअळीने हल्ला केला आहे.

Bondal crisis again on cotton in Beed district | बीड जिल्ह्यात कापसावर पुन्हा बोंडअळीचे संकट

बीड जिल्ह्यात कापसावर पुन्हा बोंडअळीचे संकट

ठळक मुद्देकृषी विभागाकडून बांधावर जाऊन मार्गदर्शन : योग्य नियोजन केल्यास अळीचे नियंत्रण; शेतकरी धास्तावला

बीड : जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून कापूस पिकांवर बोंडअळीचे संकट घोंगावत आहे. यावर्षी देखील कापूस पिकावर बोंडअळीने हल्ला केला आहे. शेतकऱ्यांनी योग्य नियोजन केले तर बोंडअळी नियंत्रणात येऊ शकते यासाठी कृषी विभागाकडून जनजागृती विविध माध्यमातून तसेच बांधावर जाऊन जनजागृती केली जात आहे.
मागील दोन वर्ष दुष्काळी परिस्थिती तसेच यावर्षी पिके बहरात असताना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीमधून कापूस काही ठिकाणी चांगल्या स्थिती आहे. परंतु वेचणीची सुरुवात होताच बोंडअळीने कापसावर हल्ला केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कापूस उत्पादनात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर्षी पासाचा कालावधी वाढल्यामुळे बोंडअळीच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता जास्त आहे. कोषातून बाहेर पडलेल्या पतंगाचे मिलन होऊन त्यांनी पानावर अंडी घातल्यानंतर ८ ते १० दिवसांनी या किडीचा प्रादुर्भाव हिरवी बोंडे व पात्यांवर होते. त्यामुळे कापूस उत्पादनात घट होते. यासाठी शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करावे असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांनी केले आहे. तसेच तालुकास्तरावरील अधिका-यांनी कार्यक्षेत्रातील शेतकºयांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या कराव्यात उपाययोजना
कापूस पीक असेलल्या क्षेत्रात एकरी दोन कामगंध सापळे लावावेत. त्याची सतत ३ दिवस पाहणी करावी. त्यामध्ये ७ ते ८ पतंग आढळून आल्यास ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा अ‍ॅझाडिरेक्टीन १५०० पीपीएम २५ मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
बोंडे, पात्या, फुले यामध्ये प्रादुर्भाव ५ ते १० टक्के असल्यास इंडोक्झाकार्ब १५.८ टक्के प्रवाही १० मिली किंवा थायेडिकार्ब ७५ टक्के भुकटी २० ग्रॅम किंवा लेंमड सायहॅलोथ्रीन ४.९ सीएम, १० मिली किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के एएफ २५ मिली क्लोरीपायरीफॉस २० टक्के प्रवाई २५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव १० टक्क्यांपेक्षा जास्त आढळून आला तर इमामेक्टीन बेंझोएट ५ टक्के दाणेदार ४ ग्रॅम किंवा बाजारात उपलब्ध मिश्र किटकनाशके जसे की प्रोफेनोफॉस ४० टक्के अ सायपरमेथ्रीन ४ टक्के २० मिली किंवा डेल्टामेथ्रीन १ अ ट्रायझोफॉस ३५ टक्के प्रवाही १२.५० मिली किंवा क्लोरोपायरीफॉस ५० अ सायपरमेथ्रीन ५ टक्के २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावी. शेतक-यांनी फवारणी करताना काळजी घ्यावी असे आवाहन बीड तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी केले आहे.
शेतक-यांनी फरदडचा मोह टाळणे अतिआवश्यक
शेतक-यांनी शेतातील बोंडअळीचे प्रादुर्भावाचे प्रमाण लक्षात घ्यावे, त्यासाठी योग्य ते नियोजन करावे. या कालावधीत कापूस पिकाची वेचणी झाल्यानंतर पुन्हा अंदाज घेऊन उपाययोजना कराव्यात. डिसेंबर २०१९ या महिना अखेर शेतातील कापूस पीक अंदाजानुसार काढून टाकावे. पुढील हंगामातील बोंडअळी नियंत्रणासाठी फरदड घेण्याचा मोह टाळून शेतातील कापूस बांधावर जाळून नष्ट करावा.

Web Title: Bondal crisis again on cotton in Beed district