परळी: तालुक्यातील पांगरी रस्त्यावर बुधवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात भाजपाचे जळगव्हाण तांडा येथील सरपंच वसंत ताराचंद चव्हाण (वय ५५) व त्यांची नात श्रुती विजय चव्हाण (वय ८) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सरपंचांच्या पत्नी कस्तुराबाई वसंत चव्हाण या गंभीर जखमी असून त्यांच्यावर परळी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी श्रुतीवर परळीतील खासगी रुग्णालयात उपचार करून चव्हाण कुटुंब जळगव्हाण गावाकडे परतत होते. यावेळी परळी-पांगरी रस्त्यावर बांधकाम साहित्याने भरलेल्या टिपरने बुलेट मोटारसायकलला जोराची धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की सरपंच वसंत चव्हाण आणि त्यांची नात श्रुती यांचा जागीच मृत्यू झाला.
माहिती मिळताच घटनास्थळी अंबाजोगाईचे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे, परळी संभाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय ढोने,परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मजहर सय्यद, जमादार दत्ता उबाळे, सुनील अन्नमवार व परळी ग्रामीण पोलिसांनी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह रुग्णालयात रवाना केला. या प्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.