परळी : तालुक्यातील पांगरी तांडा परिसरात एक ऑगस्ट रोजी सकाळी नऊच्या सुमारास भीषण अपघात झाला. बीडहून नांदेडकडे जाणाऱ्या शिवशाही एसटी बसने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने रिक्षाचालक जागीच ठार झाला. या घटनेने परिसरात तणाव निर्माण होऊन काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती.
मृत रिक्षाचालकाचे नाव श्रीनिवास शिवाजी राठोड (वय २३, रा. पांगरी तांडा) असे आहे. त्यांनी रिक्षातून काही प्रवाशांना कामाच्या ठिकाणी सोडल्यानंतर पांगरी रोडने तांड्याकडे परतत असताना शिवशाही बसने ( एमएच ०४ एफएल ०९८८ ) त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षा काही अंतर फरफटत गेल्याने श्रीनिवास राठोड यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर संतप्त नागरिकांनी एसटी बसच्या काचा फोडल्या. घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रवाशांनीही घटनास्थळी उतरून मदतीचा हात दिला. दरम्यान, परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मजहर सय्यद, उपनिरीक्षक शेख, सहाय्यक फौजदार लक्ष्मण टोले, जमादार दत्ता उबाळे, रमेश तोटेवाड, सुनील अन्नमवार आदींनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत वाहतूक सुरळीत केली व परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेची नोंद परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात येत असून, पुढील तपास सुरू आहे.