पोलीस भरतीसाठी बीड प्रशासन झाले सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 23:33 IST2018-03-06T23:30:57+5:302018-03-06T23:33:51+5:30
बीड जिल्हा पोलीस दलात ५३ जागांसाठी १२ मार्चपासून प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक भास्कर सावंत यांनी जागेची पाहणी केली. भरती पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

पोलीस भरतीसाठी बीड प्रशासन झाले सज्ज
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्हा पोलीस दलात ५३ जागांसाठी १२ मार्चपासून प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक भास्कर सावंत यांनी जागेची पाहणी केली. भरती पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पोलीस दलाच्या आस्थापनेवरील ५३ जागेसाठी ५ फेब्रुवारीपासून अर्ज स्विकारण्यास सुरूवात झाली होती. ३ मार्च अखेरची तारीख होती. या कालावधीत आठ हजार ३२१ अर्ज आले होते. पैकी सात हजार १७४ पुरूष तर एक हजार १४७ महिलांचा समावेश होता. चुकीची माहिती भरल्याने ८७ उमेदवारी अर्ज अपात्र ठरविण्यात आले होते.
दरम्यान, १२ मार्चपासुन प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. यामध्ये कसलीच गडबड गोंधळ होणार नाही, याची दक्षता जिल्हा पोलीस दलाने घेतली आहे.
तसेच ही पारदर्शकपणे भरती पार पाडण्यासाठी त्यांनी नियोजन केले आहे. यासाठी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बो-हाडे हे यावर लक्ष ठेवून असतील. तसेच चार पोलीस उपअधीक्षक, १० पोलीस निरीक्षक, ६० अधिकारी आणि ३०० कर्मचारी याठिकाणी तैनात केले आहेत. पहिल्या दिवशी ७५० उमेदवारांची मैदानी चाचणी होईल. त्यानंतर रोज १ हजार उमेदवारांची चाचणी होणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.