गतिरोधकावर पांढऱ्या रंगाचे पट्टे मारावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:25 IST2021-06-02T04:25:27+5:302021-06-02T04:25:27+5:30

रस्त्याची दुरवस्था; दुरुस्तीची मागणी गेवराई : तालुक्यातील जातेगाव ते गेवराई या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे ...

Apply white stripes on the brakes | गतिरोधकावर पांढऱ्या रंगाचे पट्टे मारावेत

गतिरोधकावर पांढऱ्या रंगाचे पट्टे मारावेत

रस्त्याची दुरवस्था; दुरुस्तीची मागणी

गेवराई : तालुक्यातील जातेगाव ते गेवराई या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, दुचाकीस्वारांना मणक्याचे आजार जडण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

कडबा दोन हजार रुपये शेकडा

बीड : पशुधनाच्या चाऱ्यासाठी रब्बी हंगामात निघालेल्या ज्वारीच्या कडब्याला सोन्याचा भाव आला असून पशुधन जगविण्यासाठी शेतकरी मिळेल त्या भावाने कडब्याची खरेदी करून साठवण करीत आहेत. त्यामुळे ज्वारीच्या कडब्याचे भाव आतापासूनच वाढत चालले आहेत. ज्वारीच्या शंभर पेंढ्यांना दोन हजारांपेक्षा अधिक रक्कम मोजावी लागत आहे.

सुजाण नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे

बीड : राज्यात कोरोनाच्या उद्रेकाचा परिणाम थेट रक्ताच्या साठ्यावर झाला असून केवळ पाच ते सहा दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक आहे. सुजाण नागरिकांनी तसेच रक्तदानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी अधिकाधिक कार्य करून रक्तदानासाठी पुढे यावे. असे आवाहन केले जात आहे.

फळांना मागणी वाढली

अंबाजोगाई : शहरातील बाजारपेठेत मागील आठवडाभरापासून फळांची आवक वाढली आहे. सध्या बाजारात द्राक्षे, पपई, अननस, टरबूज, खरबूज, सफरचंद, संत्री, मोसंबी, केळी, चिकू, नारळपाणी या फळांची आवक वाढली आहे. द्राक्षे ५० रुपये, तर खरबूज ४० रुपये किलो दराने विक्री होत आहे. उष्णतेपासून थंडावा मिळावा म्हणून फळांची मागणी वाढली असल्याचे फळविक्रेते खलील मौलाना यांनी सांगितले.

ग्रामपंचायतीकडून मार्गदर्शन

अंबाजोगाई : तालुक्यात कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागातही वाढला आहे. ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी कोरोना संसर्गापासून बचाव कसा करायचा? काय काळजी घ्यायची? कोरोनाच्या त्रिसूत्रीचा अवलंब करावा. याबाबत गावचे ग्रामसेवक, तलाठी यांच्या माध्यमातून ग्रामस्थांना दक्षता घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. कोरोनाची साखळी रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना सांगितल्या जात आहेत.

गाजर गवताच्या वेढ्याने अस्वच्छता

अंबाजोगाई : शहरातील शासकीय कार्यालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गाजर गवत वाढले आहे. यामुळे डासांची उत्पत्तीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. स्वच्छतेकडे अद्यापही दुर्लक्ष केले जात आहे. ही स्वच्छतेची समस्या मार्गी लावली जात नाही. स्वच्छता करून ही समस्या मार्गी लावावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे.

प्लास्टिक बंदी केवळ कागदावरच

बीड : प्लास्टिक वापरासाठी बंदी असतानाही अंबाजोगाई शहर व परिसरात अजूनही सर्रासपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. व्यावसायिकांकडून प्लास्टिक पिशव्यांमध्ये विविध वस्तू दिल्या जातात. भाजी मार्केटमध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर सर्रास सुरू आहे. नगरपरिषदेने याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

Web Title: Apply white stripes on the brakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.