कृषी कायदा शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देणारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:31 IST2020-12-29T04:31:59+5:302020-12-29T04:31:59+5:30
परळी : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांच्या अपेक्षांना पूर्ण करणारे निर्णय घेत आहे. नवा कृषी ...

कृषी कायदा शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देणारा
परळी : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांच्या अपेक्षांना पूर्ण करणारे निर्णय घेत आहे. नवा कृषी कायदा देखील शेतकऱ्यांच्या हिताचा असून, शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देणारा असल्याचे प्रतिपादन खा.डॉ. प्रीतम मुंडे यांनी केले. परळी तालुक्यातील पौळ पिंपरी येथे शेतकरी संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, किसान मोर्चाचे उत्तमराव माने, अश्रूबा काळे, बाबासाहेब काळे, सुधाकर पौळ, सुरेश माने यांच्यासह भाजप कार्यकर्ते व असंख्य शेतकरी उपस्थित होते. खा. मुंडे म्हणाल्या, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संकटाच्या काळात शेतकऱ्यांना भरीव मदत केली. देशातील नऊ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा अठरा हजार कोटी रुपयांचा निधी वर्ग केला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनादेखील मदत करण्याची घोषणा केंद्र सरकारने केल्याचे यावेळी खा. मुंडे म्हणाल्या. तसेच देशातील गोरगरिबांचे प्रश्न सोडवून त्यांना आवश्यक मदत आणि मजुरांना न्याय देण्याचे काम प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार करत असल्याचे त्या म्हणाल्या. या कायद्याबाबत काही लोक अपप्रचार आणि संभ्रम पसरवत असले तरी देशातील शेतकऱ्यांनी या कायद्याचे समर्थन आणि स्वागत करणे अभिमानास्पद असल्याचे खा. मुंडे म्हणाल्या.