३४० गावांनी कोरोनाला वेशीबाहेर हाकलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:24 IST2021-05-31T04:24:34+5:302021-05-31T04:24:34+5:30

सोमनाथ खताळ बीड : जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत कोरोनाने ग्रामीण भागात जास्त पाय पसरले होते. असे असले तरी सद्य:स्थितीत जिल्ह्यातील ...

340 villages drove Corona out of the gates | ३४० गावांनी कोरोनाला वेशीबाहेर हाकलले

३४० गावांनी कोरोनाला वेशीबाहेर हाकलले

सोमनाथ खताळ

बीड : जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत कोरोनाने ग्रामीण भागात जास्त पाय पसरले होते. असे असले तरी सद्य:स्थितीत जिल्ह्यातील ३४० गावांनी कोरोनाला वेशीबाहेर हाकलून गाव कोरोनामुक्त ठेवले आहे. सध्या ग्रामीण भागात ३ हजार ३८५ ॲक्टिव्ह रुग्ण असून, पॉझिटिव्हिटी रेट हा १०.९ टक्के एवढा आहे. ग्रामीण आरोग्य यंत्रणेने केलेल्या उपाययोजनांमुळे कोरोनाला हद्दपार करण्यात यश येत आहे.

जिल्ह्यात एक हजार ३१ ग्रामपंचायती असून, त्याअंतर्गत १ हजार ४०२ गावे आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ग्रामीण भाग सुरक्षित होता; परंतु दुसऱ्या लाटेत शहरांपेक्षा ग्रामीण भागात रुग्णसंख्या झपाट्याने वाढली होती. हाच धागा पकडून आरोग्य विभागाने तत्काळ उपाययोजना केल्या. मिशन झीरो डेथ, सर्वेक्षण, कोमार्बीड रुग्ण शोधणे, अँटिजन कॅम्प घेणे, आरटीपीसीआर स्वॅब घेऊन चाचण्यांची संख्या वाढवीत रुग्णसंख्या शोधली. त्यामुळे वाढणाऱ्या रुग्णसंख्येला आता ब्रेक लागत आहे. आतापर्यंत ३८ हजार रुग्ण ग्रामीण भागात निष्पन्न झाले असून, पैकी सद्य:स्थितीत ३ हजार ३८५ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. ८७१ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. असे असले तरी योग्य उपाययोजना आणि नियोजनामुळे आरोग्य विभागाला ग्रामीणमधील रुग्णसंख्या रोखण्यात यश आले आहे. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, सर्व वैद्यकीय अधिकारी, आशा, अंगणवाडीसेविका, इतर कर्मचारी यासाठी परिश्रम घेत आहेत.

....

मुख्य सचिवांकडून कुंभार व टीमचे कौतुक

ग्रामीण भागातील आढावा राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी शनिवारी घेतला. यात बीडचा अहवाल सीईओ अजित कुंभार यांनी सादर केला. मिशन झीरो डेथ, पॉझिटिव्ह रुग्ण शोधणाऱ्या आशांना १०० रुपये बक्षीस, सर्वेक्षण, चाचण्या वाढविणे, गावांमध्ये समिती नियुक्त करणे, आदी उपाययोजना केल्याचे सांगितले, तसेच लसीकरणासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून गर्दी कशी टाळली आणि त्याचा कशा प्रकारे फायदा होतो, हे कुंभार यांनी मांडले. ही बाब सचिव कुंटे यांना भावली आणि त्यांनी कुंभार यांच्यासह सर्व टीमचे तोंडभरून कौतुक केले.

....

मुख्य सचिवांसमोर सर्व बाबी मांडल्या. आतापर्यंतची ग्रामीण भागातील स्थिती आणि केलेल्या उपाययोजना, तंत्रज्ञानाचा वापर याची सर्व माहिती देण्यात आली. ग्रामीण भागातील पॉझिटिव्हिटी रेट कमी करण्यासाठी आपण प्रयत्न करत असून, याला यश येत असल्याचे दिसते. ग्रामीण आरोग्य यंत्रणा परिश्रम घेत आहे.

-अजित कुंभार, मुख्य कार्यकारी अधिकारी, बीड

.....

ग्रामीण भागात सुरुवातीपासूनच यंत्रणा सक्षमपणे काम करीत आहे. थोड्याफार चुका होत्या, त्यात सुधारणा केली. शहरापेक्षा आजही ग्रामीणची स्थिती चांगली आहे. तरीही आम्ही गाफील राहत नसून, नवनवीन उपाययोजना करून गावे कोरोनामुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. माझी सर्व टीम दिवसरात्र मेहनत घेत आहे.

-डॉ. आर.बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड

-----

...अशी आहे ग्रामीण भागाची आकडेवारी

एकूणे गावे १,४०२

एकूण ग्रामपंचायती १,०३१

एकूण लोकसंख्या २४,२१,६५०

आतापर्यंतचे एकूण कोरोनाबाधित रुग्ण ३८,३८६

सद्य:स्थितीत एकूण ॲक्टिव्ह रुग्ण ३३८५

आतापर्यंत एकूण कोरोनाबळी ८७१

सद्य:स्थितीत कोरोनामुक्त ग्रामपंचायती २६७

सद्य:स्थितीत कोरोनामुक्त गावे ३४०

सद्य:स्थितीत पॉझिटिव्हिटी रेट १०.९

एकूण आयसोलेशन बेड ३,०४०

सीसीसीमधील बेड १,९७५

एकूण ऑक्सिजन बेड ६५५

एकूण आयसीयू बेड १६०

Web Title: 340 villages drove Corona out of the gates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.