लग्नाला २०० लोकांची परवानगी, पण चार महिने मुहूर्तच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:39 IST2021-08-18T04:39:48+5:302021-08-18T04:39:48+5:30
बीड : सेकंड अनलॉकमध्ये कोविड-१९ संबंधित नियमांच्या अधीन राहून शासनाने निर्बंध शिथिल करीत परवानगी दिल्याने आधी ५० लोकांमध्ये ...

लग्नाला २०० लोकांची परवानगी, पण चार महिने मुहूर्तच नाही
बीड : सेकंड अनलॉकमध्ये कोविड-१९ संबंधित नियमांच्या अधीन राहून शासनाने निर्बंध शिथिल करीत परवानगी दिल्याने आधी ५० लोकांमध्ये होणारे विवाह सोहळे आता यापुढे २०० लोकांच्या उपस्थितीत करता येणार आहेत. मात्र शुध्द मुहूर्त आणि लग्नसराई होऊन गेल्यानंतर शासनाने परवानगी दिल्याने त्याचा काय उपयोग? अशा प्रतिक्रिया मंगल कार्यालय चालक, मालक तसेच बँड पथकांच्या प्रमुखांनी व्यक्त केल्या.
कोरोना संसर्गामुळे मार्च २०२० पासून मंगल कार्यालये बंद आहेत. तर विवाहासाठी उपस्थितीची मर्यादा घातल्याने अनेकांनी साधेपणाने लग्न उरकून घेतले. तर काही ठिकाणी शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून मोठी गर्दी जमवून विवाह आयोजनाबद्दल वधू-वर पक्षाकडील मंडळींसह हॉटेल, मंगल कार्यालय चालकांवर कारवाया झाल्या. आता २०० लोकांना उपस्थितीसाठी परवानगी दिली तरी तारखा नसल्याने मंगल कार्यालय, बँड, आचारी, केटर्सकडे बुकिंगच नसल्याची स्थिती आहे. कारण चातुर्मासात विवाह करण्याचे अनेक जण टाळतात.
लग्नसमारंभासाठी या आहेत अटी
लॉन : खुले प्रांगण, लॉनमध्ये होणाऱ्या विवाह सोहळ्यास उपस्थितांची संख्या प्रांगण किंवा लॉन क्षमतेच्या ५० टक्के, परंतु जास्तीत जास्त २०० व्यक्ती या मर्यादेत असेल.
मंगल कार्यालय : बंदिस्त मंगल कार्यालय, हॉटेलमध्ये उपस्थितांची संख्या क्षमतेच्या ५० टक्के, परंतु जास्तीत जास्त १०० व्यक्ती या मर्यादेत असेल.
मंगल कार्यालय, हॉटेल, लॉन व्यवस्थापन, भोजन व्यवस्थापन, बँडपथक, भटजी, फोटोग्राफर्स अशा विवाह व्यवस्थेशी संबंधित सर्वांना कोविड नियमांचे पालन करावे लागणार.
या संलग्न संस्थांमधील व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांचे ओळखपत्रासह कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण केल्याचे (दोन्ही डोस) प्रमाणपत्र सोबत असणे आवश्यक राहील.
----------
आता चार महिने तारखाच नाहीत, त्यामुळे शासनाने दिलेल्या परवानगीचा काय उपयोग? मोठे मुहूर्त होऊन गेले. मागील १८ महिन्यांतील नुकसान कधीही भरून येण्यासारखे नाही. तिसरी लाट आली तर पुन्हा संकट आहेच. सध्या बुकिंग नाही. कार्तिक पौर्णिमेनंतरच काय ते कळेल.
- संतोष सोहनी, मंगल कार्यालय मालक, बीड
----------------
शासनाने परवानगी दिली असली तरी श्रावणमास सुरू आहे. चातुर्मासात लोकांची मानसिकता नाही. तिसरी लाट आल्यास बुकिंगचे पैसे परत मिळतील का? त्यावेळी किती लोकांसाठी परवानगी असेल का? अशी चौकशी लोक करतात, त्यामुळे विवाहाच्या बुकिंग झालेल्या नाहीत.
- रवींद्र शिवणीकर, मंगल कार्यालय चालक, बीड
---------
कोरोनामुळे मागील सतरा महिन्यांपासून बँडवर निर्बंध असल्याने कलाकारांची मोठी उपासमार झाली. अजूनही या आर्थिक संकटातून कोणी सावरलेले नाही. आता शासनाने परवानगी दिली असली तरी तारखाच नसल्याने बँडसाठी ऑर्डर कोठून मिळणार?
- अरुण दोडके, बँड पथक प्रमुख, बीड
-------------
कोरोनामुळे बँड कलाकारांचे मोठे नुकसान झाले आहे. दीड वर्ष कसे काढले आम्हालाच माहीत. लग्नसराईचा मोसम होऊन गेल्यावर सरकारने परवानगी दिल्याने आनंद वाटण्यासारखे काही नाही. कारण ऑर्डर नाहीत. दिवाळीनंतरच कळेल.
- देवीदास दोडके, बँड पथक प्रमुख, बीड
------------
लग्नाच्या तारखा
ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये शुद्ध मुहूर्त नाहीत. मात्र १८, २०, २१, २५, २६, २७, ३०, ३१ ऑगस्ट व १, ८, १६, १७ सप्टेंबर या गौण मुहूर्ताच्या तारखा आहेत.
----
आषाढापासून चातुर्मासाचा कालावधी विवाहासाठी निषिध्द मानलेला आहे. चातुर्मासात होणाऱ्या विवाहांना शास्त्राधार नाही. त्यामुळे कार्तिक पौर्णिमेपर्यंत विवाहाचे शुद्ध मुहूर्त नाहीत. अत्यंत अडचण असणारेच विवाह करतात, ते प्रमाण तुरळक असून साध्या पध्दतीने उरकले जातात.
- राहुल जोशी, पुरोहित, बीड
--------