अंबाजोगाई तालुक्यातील १६ गावे समृद्धीच्या वाटेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:35 IST2021-09-03T04:35:39+5:302021-09-03T04:35:39+5:30
अंबाजोगाई : पानी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेमध्ये अंबाजोगाई तालुक्यातील १६ गावांनी स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण ...

अंबाजोगाई तालुक्यातील १६ गावे समृद्धीच्या वाटेवर
अंबाजोगाई : पानी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेमध्ये अंबाजोगाई तालुक्यातील १६ गावांनी स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण केला. गावातील विहीर पाणी पातळी मोजमाप, विहीर बोरवेल गणना, हंगामनिहाय पीक सर्व्हे इत्यादी कामे करून आपल्या गावाला समृद्धीच्या दिशेला घेऊन जाणाऱ्या गावांचा सन्मान करण्यात आला. टी. बी. गिरवलकर तांत्रिक महाविद्यालयाच्या सभागृहात हो सोहळा पार पडला. यावेळी उपस्थितांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, रोपे देऊन सन्मान करण्यात आला.
मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी, उपविभागीय अधिकारी शरद झाडके, गटविकास अधिकारी संदीप घोन्सीकर, मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, प्रसाद चिक्षे, प्रा. बाबासाहेब ठोंबरे, धनराज सोळंकी, डॉ. निशिकांत पाचेगावकर, भारत पवार, पानी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक संतोष शिनगारे, विनोद ठोंबरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी सरकारी योजनेची जोड देऊन आपली शेती समृद्ध करण्याचे आवाहन केले. अनिकेत लोहिया म्हणाले, वॉटर कप स्पर्धेत गावांनी पाणलोटाची खूप कामे केली. परंतु आता या कामातून जे पाणी अडवले त्याचे योग्य नियोजन करून गावे समृद्ध करण्याची गरज आहे.
प्रसाद चिक्षे म्हणाले, गावच्या एकीने तालुक्यात गावाला वेगळी ओळख दिली. पण आता महाराष्ट्रामध्ये गावाची वेगळी ओळख होण्यासाठी गावामध्ये समृद्ध गाव स्पर्धेतील सहा स्तंभांवर कामे करून आपले गाव समृद्धीच्या दिशेने घेऊन जावे. दत्तात्रय गिरी म्हणाले, वॉटर कप स्पर्धा आनंद उत्सव म्हणून साजरी केली. गावे पाणीदार केले. पाण्याचा प्रश्न मिटला. आता समृद्ध स्पर्धेच्या माध्यमातून आपली शेती व आपले गाव समृद्ध करून पुन्हा एकदा आनंदोत्सव साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन विनोद ठोंबरे यांनी केले. तर महेश गुळभिले यांनी आभार मानले.
अंबाजोगाईचे दिशादर्शक काम
शरद झाडके म्हणाले, २०१६ साली वॉटर कपच्या माध्यमातून अंबाजोगाई तालुक्याने महाराष्ट्रमध्ये आदर्श असे काम केले. महाराष्ट्राला दिशा दिली. आता समृद्ध गाव स्पर्धेच्या माध्यमातून परत एकदा दिशादर्शक काम करावे. आपले गाव व तालुका समृद्ध करण्यासाठी लागणाऱ्या प्रशासकीय मदतीसाठी प्रशासन सदैव तत्पर आहे.
या गावांचा झाला सन्मान
ऊजनी, खापरटोन, भतानवाडी, साळुंकवाडी, ममदापूर (परळी), मांडवा(पठाण), गिरवली (आपेट), सुगाव, सेलुअंबा, दैठणा, राडी तांडा, कुंबेफळ, धानोरा (खुर्द), कोळकानडी, सनगाव, वरपगाव आदी गावांचा सन्मान करण्यात आला.
020921\img-20210902-wa0082.jpg
पाणी फाऊंडेशन चा कार्यक्रम