बीडच्या १२ हजार शेतकऱ्यांनी उचलले नांदेडचे अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:23 IST2021-06-26T04:23:53+5:302021-06-26T04:23:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : पीएम किसान योजनेत देशाच्या सर्वच भागात अनेक गैरप्रकार झालेले समोर आले असतानाच आता नांदेड ...

12,000 Beed farmers pick up Nanded grant | बीडच्या १२ हजार शेतकऱ्यांनी उचलले नांदेडचे अनुदान

बीडच्या १२ हजार शेतकऱ्यांनी उचलले नांदेडचे अनुदान

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : पीएम किसान योजनेत देशाच्या सर्वच भागात अनेक गैरप्रकार झालेले समोर आले असतानाच आता नांदेड जिल्ह्यातील ३० हजार बोगस लाभार्थ्यांमध्ये तब्बल १२ हजार शेतकरी बीड जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. या १२ हजार ३३ व्यक्तींकडून तब्बल ६ कोटी ३५ लाख रुपये वसुलीचे आदेश नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सदर रक्कम वसूल करून द्यावी, असे निर्देश कृषी आयुक्तांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. यासंदर्भात संबंधित शेतकऱ्यांनी पैसे भरले नाही तर गुन्हे दाखल होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना मासिक ५०० रुपये अनुदान देणारी पीएम किसान योजना जाहीर केली. मात्र, या योजनेत मोठ्या प्रमाणावर बोगस लाभार्थी घुसल्याचे आता ठिकठिकाणी समोर येत आहे. अनेक जिल्ह्यांत आयकर भरणाऱ्या व्यक्तींना देखील या योजनेचा लाभ मिळाला आहे. या योजनेची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर वर्ग होते. त्यामुळे अनेकांना आपली नावे या यादीत आहेत हेदेखील माहीत नाही. तर काहींनी जाणीवपूर्वक खोटी माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतला आहे.

नांदेड जिल्ह्यात या योजनेतील लाभार्थ्यांची तपासणी करताना सुमारे ३० हजार लाभार्थी अपात्र असतानाही त्यांना या योजनेचा लाभ दिल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांचा पुढील लाभ थांबविण्यात आला आहे. मात्र, या ३० हजार लाभार्थ्यांमध्ये तब्बल १२ हजार ३३ लाभार्थी बीड जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या अनुदानाची रक्कमदेखील बीड जिल्ह्यातील बँकांमध्ये जमा करण्यात आली आहे. पीएम किसानच्या पात्र लाभार्थ्यांकडून सदर रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यांनतर सदर बाब उघड झाली आहे. बीड जिल्ह्यातील सुमारे १२ हजार लाभार्थ्यांकडून तब्बल ६ कोटी ३५ लाख रुपये वसूल करून ते नांदेड जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात वर्ग करावेत, असे निर्देश आता राज्याच्या कृषी आयुक्तांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

---

बीड जिल्ह्यातीलच वसुली थकली

बीड जिल्ह्यातही या योजनेचा तब्बल ३६ हजार ५९४ अपात्र व्यक्तींनी लाभ घेतल्याचे चित्र आहे. यांच्याकडून तब्बल २१ कोटी ८६ लाख रुपये वसूल करण्याचे आदेश आहेत. मात्र, आतापर्यंत यापैकी केवळ २७८९ व्यक्तींकडून २ कोटी ६६ लाख इतकीच रक्कम वसूल झाली आहे. उर्वरित ३३ हजार व्यक्तींकडून आणखी १९ कोटी रुपयांची वसुली करायची आहे. बीड जिल्हा प्रशासनाला तीच वसुली होत नसताना आता नांदेड जिल्ह्यात अनुदान घेतलेल्या शेतकऱ्यांची यादी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची अवस्था ‘घरचे झाले थोडे आणि व्याह्याने धाडले घोडे’ अशी झाली आहे.

.........

पीएम किसान योजनेतील बोगस लाभार्थ्यांच्या संदर्भात नांदेड जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र प्राप्त झाले आहे. यासंदर्भात चौकशी केली जाईल. ज्यांना हे पैसे मिळाले आहेत. त्यांनी ते शासनाला परत करावेत अन्यथा पुढील कारवाई केली जाईल.

-रवींद्र जगताप, जिल्हाधिकारी, बीड.

Web Title: 12,000 Beed farmers pick up Nanded grant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.