पर्यावरण वाचविण्यासाठी भारतीय बाजारात इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे. एकीकडे ईलेक्ट्रीक वाहनांच्या किंमती जास्त आहेत, परंतू इंधनाच्या बाबतीत खिशाला परवडणारी देखील आहेत. परंतू, पर्यावरणाच्या दृष्टीने विचार केला तर जी माहिती समोर येत आहे ती निश्चितच चिंताजनक आहे. इलेक्ट्रीक कार या पेट्रोल, डिझेल कारच्या तुलनेत जास्त प्रदुषणकारी असल्याचे दावे करण्यात येत आहेत.
मुळात इलेक्ट्रीक आणि इंधनावरील वाहने बनविण्यामध्ये फारसा फरक नसतो. चेसिस, पार्ट आदी सारखेच असतात. फरक असतो तो फक्त इंजिन-मोटर आणि इंधनच्या ऐवजी बॅटरी. ही बॅटरी बनविण्याची जी प्रक्रिया आहे तीच निसर्गासाठी घातक ठरत आहे. काही रिसर्चनुसार पेट्रोल-डिझेल कारच्या तुलनेत, ईव्ही वाहनांमध्ये एकूण कार्बन उत्सर्जन सुमारे ४६ पट जास्त आहे. पेट्रोल, डिझेल वाहने २६ टक्के कार्बन उत्सर्जन करतात.
एवढेच नाही तर एक ईव्ही कार बनविण्यासाठी सुमारे ५-१० टन (CO2) कार्बन डायऑक्साइड बाहेर पड़तो. कारण ईव्ही कार बनविण्यासाठी जी बॅटरी बनविली जाते त्यातून पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. १ बॅटरी बनवण्यासाठी तुम्हाला सुमारे ८ ते १० किलो कोबाल्ट, ३५ किलो मँगनीज आणि ८ किलो लिथियमची आवश्यकता असते. कोबाल्ट हा धातू आहे, जो सहज उपलब्ध नाही. यामुळे कार कंपन्या त्याच्याजागी निकेल वापरता. त्यासाठी खाणींमध्ये उत्खनन करावे लागते. लिथियम आणि मँगनीजसाठी देखील मोठ्या प्रमाणावर उत्खनन करावे लागते. यातून पर्यावरणाची प्रचंड हानी होते.
इलेक्ट्रीक कारकडून होणारे प्रदूषण यावरच थांबत नाही तर ईव्ही बनविल्यानंतरही ती प्रदूषण करतच असते. तुम्ही म्हणाल कसे, बॅटरी बनविताना प्रदूषण झालेलेच असते. आता हीच बॅटरी वजनदार असल्याने वाहन थांबविताना ब्रेक आणि टायरद्वारे पेट्रोल, डिझेल कारपेक्षा जास्त प्रदूषण होते. एमिशन अॅनालिटिक्सच्या अहवालानुसार, ईव्ही कारच्या ब्रेक आणि टायर्समधून निघणारे कण सामान्य कारपेक्षा १,८५० पट जास्त असतात. जड बॅटरीमुळे कारच्या ब्रेक आणि टायर्सची झीज जास्त होते. मग आता इलेक्ट्रीक कार पर्यावरण पूरक कशा ठरतात? तर शहरी भागात त्या धूर सोडत नाहीत, यामुळे ईव्ही कार पर्यावरण वाचवितात. जे काही प्रदूषण होते ते मायनिंगच्या ठिकाणी, बॅटरी बनविण्याच्या घटकांच्या फॅक्टरींमध्ये असा तर्क काढला जातो. यामुळे त्या पर्यावरणपूरक ठरतात.