वन्यप्राण्यांची थांबणार भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 06:00 IST2020-03-13T06:00:00+5:302020-03-13T06:00:52+5:30
पाणवठ्यांसोबतच वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या पाणवठ्यांमध्ये सध्या मुबलक पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे यंदा वडाळी, पोहरा, चिरोडी, माळेगाव, चांदूर रेल्वे या वर्तुळाच्या जंगलात वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची चणचण भासणार नाही, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

वन्यप्राण्यांची थांबणार भटकंती
अमोल कोहळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
पोहरा (बंदी) : यंदा प्रमाणापेक्षा अधिक झालेला पाऊस आणि पाणीसाठवण क्षमता वाढविण्यासाठी वडाळी आणि चांदूर रेल्वे वनविभागातर्फे नियोजनपूर्वक करण्यात आलेले प्रयत्न यामुळे जंगल परिसरातील नैसर्गिक पाणवठ्यांसोबतच वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या पाणवठ्यांमध्ये सध्या मुबलक पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे यंदा वडाळी, पोहरा, चिरोडी, माळेगाव, चांदूर रेल्वे या वर्तुळाच्या जंगलात वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची चणचण भासणार नाही, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अमरावती जिल्ह्यातील वडाळी-चांदूर रेल्वे जंगल जैवविविधतेने नटलेले आहे. विविध प्रजातींच्या वन्यप्राण्यांची संख्या या जंगलामध्ये मोठी आहे. काही वर्षांत प्रचंड प्रमाणात वाढलेल्या तापमानामुळे जंगलातील नैसर्गिक पाणवठे उन्हाळ्यात कोरडे पडले होते. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या सुविधेसाठी कृत्रिम पाणवठ्याची सुविधा वडाळी आणि चांदूर रेल्वे वनविभागाने केली.
वडाळी वनपरिक्षेत्रातील सात, तर दुसरीकडे चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रातील पाच व चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रातील चिरोडी जंगलात सिमेंटचे पाणवठे दोन वडाळी वनपरिक्षेत्रातील पोहरा एक, वडाळीतील दोन पाणवठे तयार करून पाण्याची सोय करण्यात आली आहे. प्राण्यांसाठी हा उपयुक्त उपक्रम असल्याने आनंद व्यक्त होत आहे.
या परिसरातील वन्यप्राण्यांसाठी पाण्याची कमतरता भासणार नाही. यासाठी कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणी भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. आपापल्या अधिनस्थ वनरक्षक, वनमजुरांकडून कृत्रिम पाणवठे भरले जात आहेत.
- कैलास भुंबर, वनपरिक्षेत्र अधिकारी, वडाळी