आश्रमातील वरूड्याच्या सागरनेही गमावला जीव
By Admin | Updated: September 16, 2016 01:03 IST2016-09-16T01:03:02+5:302016-09-16T01:03:02+5:30
शंकर महाराज यांच्या पिंपळखुटा येथील आश्रमात वास्तव्यास असलेल्या वरूडा या गावच्या सागर नामक

आश्रमातील वरूड्याच्या सागरनेही गमावला जीव
पुन्हा व्हावा तपास : श्रीनिवास घाडगे यांनी शोधावे सत्य
अमरावती : शंकर महाराज यांच्या पिंपळखुटा येथील आश्रमात वास्तव्यास असलेल्या वरूडा या गावच्या सागर नामक मुलाचाही दहा वर्षांपूर्वी संशयास्पदरित्या जीव गेल्याची माहिती शोधमोहिमेत उघड झाली आहे.
प्रथमेश सगणे आणि अजय वणवे या मुलांचे नरबळी घेण्याचा जो प्रयत्न आश्रमात झाला त्या पार्श्वभूमीवर सागरच्या मृत्यूमागे नेमके कारण काय, याची पाळेमुळे खणणे हे तपास अधिकारी श्रीनिवास घाडगे यांच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
सन २००६ साली घडलेल्या या संशयास्पद मृत्यूच्या घटनेची कुठेही वच्यता होणार नाही, याची शक्य ती काळजी घेण्यात आली. मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्याने या घटनेसंबंधी काय भूमिका निभावली, याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.
सागर कोण?
सागर दिवाकर पात्रे हा तिवसा तालुक्यातील वरूडा या गावचा गोंडस मुलगा. आश्रमातील शाळेत इयत्ता दहावीत तो शिकत होता. सागर शंकर महाराजांच्या सेवेत अधिक रमायचा. शिक्षणात कमी आणि पुजादी कार्यात अधिक वेळ सागर घालवित होता, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
सागरचा मोठा भाऊ रूपेश हा देखील आश्रमात असायचा. दहा वर्षांपूर्वी, २००६ साली, सप्टेंबर महिन्याच्या एक तारखेला अघटित घडले. महाराजांच्या सेवेत रमणाऱ्या सागरला मृत्यूने गाठले. त्यादिवशी सकाळी आठ-साडेआठच्या सुमारास सागर अचानक मरणासन्न अवस्थेत असल्याचे पाहिले गेले. सागर आश्रमातच निपचित पडलेला होता. घटनेची माहिती त्याचा थोेरला भाऊ, रूपेशपर्यंत पोहोचली. रूपेशच्या मते ज्यावेळी तो सागरजवळ पोहोचला, त्यावेळी सागरमध्ये धुगधुगी होती.
आश्रमातील लोकांनी सागरला नजीकच्या अंजनसिंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. सागरची स्थिती गंभीर असल्यामुळे त्याला धामणगावला हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. सागरसोबतच्या मंडळींनी त्याला धामणगावच्या खासगी रुग्णालयात नेले. खासगी रुग्णालयाने सागरला अमरावतीला नेण्याचा सल्ला दिला. अमरावतीसाठी सागरला हलविण्यात आले. बहुदा वाटेतच त्याचा मृत्यू झाला. आश्रमात शिक्षणासाठी वास्तव्यास असलेला, धार्मिक कार्यात मग्न रहणारा सागर असा अचानक निघून गेला. सागरचा प्रवेश आश्रमातील शाळेत करण्यात आला नसता, तो बाहेर शिकत असता तर मरणाने त्याला गाठले नसते. आश्रमात अध्येमध्ये काही विद्यार्थ्यांवर मरण अचानक झडप घेते, यामागचे रहस्य तपास अधिकारी श्रीनिवास घाडगे यांनी उलगडायला हवे. हाती लागलेले तीन गुन्हेगार अंतिम समजून, उडकीस आलेले दोन गुन्हे अखेरचे समजून तपासात समाधान मानण्याऐवजी; कालौघात दबलेले गुन्हे उघडकीस आणणे, हेच खरे तपास अधिकाऱ्याचे कर्तव्य ठरते.