शुध्द पाणी पुरवठ्याची जबाबदारी कोणाची?
By Admin | Updated: August 13, 2015 00:53 IST2015-08-13T00:53:01+5:302015-08-13T00:53:01+5:30
दरवर्षी पावसाळ्यात धरणातील पाण्याची पातळी वाढताच जीवन प्राधिकरणकडून अमरावतीकरांना गढूळ पाण्याचा पुरवठा होऊ लागतो.

शुध्द पाणी पुरवठ्याची जबाबदारी कोणाची?
गढूळ पाणीपुरवठा कायमच : जलशुध्दीकरण केंद्रावर अधिकाऱ्यांच्या फेऱ्या
अमरावती : दरवर्षी पावसाळ्यात धरणातील पाण्याची पातळी वाढताच जीवन प्राधिकरणकडून अमरावतीकरांना गढूळ पाण्याचा पुरवठा होऊ लागतो. हे पाणी आरोग्यासाठी घातक असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांचे असले, तरी ते पिण्यास योग्य असल्याचा दावा प्राधिकरणचे अधिकारी करीत आहेत. गढूळ पाण्यासाठी ठोस पर्याय किंवा उपाययोजनादेखील सुचविली जात नसल्याने पाणी शुध्दतेची जबाबदारी नेमकी कोणाची, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच आता शहरात पूर्ववत शुध्द पुरविण्याकडे पालकमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
गढूळ पाण्यात ‘आयरन बॅक्टेरिया’ व ‘हायड्राआॅक्साईड’चे प्रमाण असते तर दूषित पाण्यामध्ये ‘कोलिफाम’ व ‘थर्मोटॉलरन्स’ हे जिवाणू असल्याचे डॉक्टर व रसायनशास्त्रज्ञांकडून सांगण्यात आले आहे. हे जीवाणू मानवी शरीराला हानी पोहोचवू शकतात. यामुळे उलट्या व अतिसारासारखे आजार बळावतात. शहरात सद्यस्थितीत हे आजार वाढल्याचे चित्र आहे. विविध रुग्णालयांमध्ये उलट्या व अतिसारांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. इर्विन रुग्णालयात जुलै महिन्याच्या प्रत्येक आठवड्यात ७० ते १०० रुग्ण या आजाराने दाखल होतात. आता नागरिकांनी शुध्दे पाण्यासाठी जावे कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.