विनाअनुदानित, कायमविना अनुदानित शाळांना वाढीव २० टक्के अनुदान केव्हा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:20 IST2021-02-23T04:20:11+5:302021-02-23T04:20:11+5:30
अमरावती : विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांना शासनाद्धारे घोषित २० टक्के वाढीव अनुदान केव्हा मिळणार, असा सवाल शिक्षक, शाळा संचालकांनी ...

विनाअनुदानित, कायमविना अनुदानित शाळांना वाढीव २० टक्के अनुदान केव्हा?
अमरावती : विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांना शासनाद्धारे घोषित २० टक्के वाढीव अनुदान केव्हा मिळणार, असा सवाल शिक्षक, शाळा संचालकांनी उपस्थित केला आहे. दुसरीकडे पुणे विभागाने या निर्णयाच्या अंमलबजावणीस प्रारंभ केला असून, शिक्षण उपनिरीक्षकांकडून यासंबंधीची माहिती मागविली जात आहे.
विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित तत्त्वावरील मान्यता दिलेल्या आणि २० टक्के अनुदान सुरू केलेल्या खासगी माध्यमिक शाळा, तुकड्यांना वाढीव २० टक्के अनुदानास पात्र घोषित करण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे.? विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांना वाढीव २० टक्के अनुदान मिळावे, यासाठी अन्यायग्रस्त शिक्षक, शाळा संचालकांनी मुंबईत उपोषण चालविले आहे.? या उपोषाणाची दखल घेत पुणे येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे शिक्षण उपनिरीक्षक धनाजी बुटे यांनी शिक्षणाधिकारी यांच्या नावे पत्र पाठवून विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांना वाढीव २० टक्के अनुदानास पात्र घोषित करण्याच्या कार्यवाहीचे निर्देश १८ फेब्रुवारी रोजी दिले आहे.? त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित तत्त्वावरील मान्यताप्राप्त आणि २० टक्के अनुदान सुरू केलेल्या खासगी माध्यमिक शाळा, तुकड्यांना वाढीव २० टक्के अनुदानास पात्र घोषित केव्हा करणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.? वाढीव अनुदानाची गत काही वर्षांपासूनची मागणी प्रलंबित आहे.? ही मागणी तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी जोर धरीत आहे.?
----------------------
अशा आहेत जिल्ह्यातील शाळा
कायम विना अनुदानित - ५५०
स्वंयअर्थशासीत- १५०
अंशत: अनुदानित- ५०
विना अनुदानित शाळा- १००
---------------
विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांना वाढीव २० टक्के अनुदानाचा मुद्दा शासन स्तरावर प्रलंबित आहे. घोषणा करूनही गत काही वर्षांपासून २० टक्के वाढीव अनुदान दिले जात नाही. अनेकदा मोर्चे, आंदोलन करण्यात आले. मात्र, वेळकाढू भूमिकेमुळे अशा शाळांचा प्रश्न सुटत नाही.
- शरद तिरमारे, मुख्याध्यापक, दाभा