नागपूर, अमरावती विभागावर ‘जलसंकट’ ; राज्यात ७१ टक्के जलसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 16:46 IST2017-12-04T16:46:17+5:302017-12-04T16:46:40+5:30
वार्षिक पर्जन्यमानात तूट आल्याने नागपूर आणि अमरावती विभागावर जलसंकट गडद होण्याची दुचिन्हे आहेत.

नागपूर, अमरावती विभागावर ‘जलसंकट’ ; राज्यात ७१ टक्के जलसाठा
आॅनलाईन लोकमत
अमरावती : वार्षिक पर्जन्यमानात तूट आल्याने नागपूर आणि अमरावती विभागावर जलसंकट गडद होण्याची दुचिन्हे आहेत. उर्वरित विभागाच्या तुलनेत या दोन्ही शेजारी विभागात सरासरी ५० टक्के जलसाठा शिल्लक असल्याने चिंतेत अधिक भर पडली आहे.
२ डिसेंबरअखेर राज्यातील ३,२४२ मोठे, मध्यम व लघु प्रकल्पांत ७१.१५ टक्के पाणीसाठा असून गतवर्षीच्या डिसेंबरच्या तुलनेत त्यात ४ टक्क्यांनी तूट नोंदविली गेली आहे. सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने धरणक्षेत्रात पुरेसा जलसंचय होऊ शकला नाही. त्यामुळे अमरावती व नागपूर विभागातील पाणीसाठा संकुचित झाला आहेत.
अमरावती विभागातील ४४३ मोठे, मध्यम व लघु प्रकल्पांत केवळ ३८.४६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नागपूर विभागातील ३८५ एकूण प्रकल्पांमध्ये केवळ ३५.३६ टक्के जलसंचय आहे.
कोकण प्रदेशातील १७५ प्रकल्पांमध्ये ८५.१० टक्के, नाशिक प्रदेशातील ५५८ प्रकल्पांमध्ये ८१.७१ टक्के, पुणे प्रदेशातील ७२५ प्रकल्पांमध्ये ८६.३९ टक्के, तर मागील वर्षी भीषण दुष्काळ अनुभवलेल्या मराठवाडा विभागात ६५.६१ टक्के असा समाधानकारक जलसाठा आहे.
राज्यातील १४० मोठ्या प्रकल्पांमध्ये एकूण ७६.२० टक्के पाणीसाठा आहे. त्यात कोकण, नाशिक, पुणे, मराठवाडामध्ये सरासरी ८५ टक्के पाणीसाठा असताना अमरावती विभागात ३९.४६ टक्के, तर नागपूर विभागातील १७ मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ ३२.१९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. राज्यात एकूण २५७ मध्यम प्रकल्प असून अमरावती विभागातील २४ प्रकल्पांत ४६.२४, कोकणात ८१.५३ टक्के, नागपूरमधील ४२ प्रकल्पांत ४८.०९ टक्के, नाशिकमध्ये ७५.७६, पुणे विभागात ७६.४३ व मराठवाड्यातील ८१ मध्यम प्रकल्पात ५८.७१ टक्के पाणीसाठा आहे.
अमरावती विभागातील ४०९ लघु प्रकल्पांमध्ये ३१.०८ टक्के, कोकणातील १५७ प्रकल्पांत ७५.७६, नागपुरातील ३२६ लघु प्रकल्पांमध्ये ४१.६६ टक्के, नाशिकमधील ४८२ प्रकल्पात ६०.७७ टक्के, पुणे ५५.४३ व मराठवाड्यातील ८३२ प्रकल्पात ५१.२७ टक्के पाणीसाठा आहे.