३० शाळा दुरुस्तीसाठी झेडपीत निधीची वाणवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 05:01 IST2020-06-10T05:00:00+5:302020-06-10T05:01:14+5:30
मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या वादळ वाऱ्यासह पावसामुळे विविध तालुक्यांतील जिल्हा परिषदेच्या ३० शाळांमधील वर्गखोल्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शाळांच्या भिंती पडल्या व छतावरील टीनपत्रे उडून गेले आहेत. आता या शाळा शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी दुरुस्त करणे महत्त्वाचे आहे. परंतु, त्यासाठी जिल्हा परिषदेकडे पुरेसा निधी नाही.

३० शाळा दुरुस्तीसाठी झेडपीत निधीची वाणवा
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात १० मे रोजी झालेला वादळी पाऊस, गारपिटीने प्रचंड नुकसान झाले. यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या वर्गखोल्यांना फटका बसला आहे. पावसाचे दिवस तोंडावर आल्याने सदर शाळा शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी दुरुस्त करणे आवश्यक आहे. मात्र, त्यासाठी जिल्हा परिषदेकडे पुरेसा पैसा नाही. या शाळा दुरुस्त करण्यासाठी २९ मे रोजीच्या झेडपी आमसभेत निधी मागणीसाठी ठराव पारित केला आहे. सदरचा ठराव निधीकरिता जिल्हा नियोजन समितीकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, आता हा निधी केव्हा मिळणार आणि शाळा कधी दुरुस्त होतील, असा प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे.
मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या वादळ वाऱ्यासह पावसामुळे विविध तालुक्यांतील जिल्हा परिषदेच्या ३० शाळांमधील वर्गखोल्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शाळांच्या भिंती पडल्या व छतावरील टीनपत्रे उडून गेले आहेत. आता या शाळा शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी दुरुस्त करणे महत्त्वाचे आहे. परंतु, त्यासाठी जिल्हा परिषदेकडे पुरेसा निधी नाही. या कामाकरिता जिल्हा नियोजन समितीने निधी उपलब्ध करून द्यावा, यासाठी झेडपीने ठराव घेऊन तो जिल्हा नियोजन समितीकडे निधीसाठी प्रस्तावित केला आहे. परंतु, या ठरावाच्या अनुषंगाने अद्याप कुठलाही निर्णय झाला नाही.
या शाळांचे झाले नुकसान
अमरावती तालुक्यातील नया अकोला, आमला, थुगाव, बोरगाव धर्माळे, खानापूर व नांदगाव पेठ. चांदूर रेल्वे तालुक्यातील निमगव्हाण. धामणगाव रेल्वे तालुक्यातील तिवरा. चांदूर बाजार तालुक्यातील कृष्णापूर, धानोरा पूर्णा. दर्यापूर तालुक्यातील घडा, सावंगा बु., बेंबळा बु. चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ, कोयलारी, चुर्णी. धारणी तालुक्यातील कुंड, कोट. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील काजना, वाकपूर. तिवसा तालुक्यातील मार्डी व मसदी.
१० मे रोजी जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांच्या भिंती कोसळल्या. टीनपत्रे उडून गेली. यात प्रचंड नुकसान झाले. या शाळा पावसाळा व नवीन शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी दुरुस्त करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करू न द्यावा.
- प्रकाश साबळे, जिल्हा परिषद सदस्य