अडीच एकरात बहरली लिंब, सीताफळाची शेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 01:37 IST2019-03-31T01:36:40+5:302019-03-31T01:37:31+5:30
शेती करणे हा सद्यस्थितीत तोट्याचा व्यवसाय मानला जातो. मात्र, एका निवृत्त प्राचार्याने निवृत्तीपश्चात शेती यशस्वी केली आहे. वऱ्हा येथील अर्जुन गांजरे यांनी शेतात लिंब आणि सीताफळाची बाग फुलविली आहे.

अडीच एकरात बहरली लिंब, सीताफळाची शेती
सूरज दाहाट।
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : शेती करणे हा सद्यस्थितीत तोट्याचा व्यवसाय मानला जातो. मात्र, एका निवृत्त प्राचार्याने निवृत्तीपश्चात शेती यशस्वी केली आहे. वऱ्हा येथील अर्जुन गांजरे यांनी शेतात लिंब आणि सीताफळाची बाग फुलविली आहे.
अर्जुन गांजरे यांना शेतीची आवड आहे. तथापि, नोकरीमुळे त्यांना शेती करता आली नाही. पण, निवृत्तीनंतर त्यांनी शेतातील अभिनव प्रयोग इतरांसमोर ठेवले आहे. गांजरे यांनी वऱ्हा येथील पाच एकर शेतापैकी अडीच एकरात ५०० लिंबांची थायलंड सीडलेस जातीची आणि ५०० सीताफळाची झाडे लावली. अवघ्या दीड वर्षांतच लिंबांच्या झाडाला मोठ्या प्रमाणात फळे लागली. पुढल्या वर्षी सीताफळाला फळे येतील, असे गांजरे म्हणाले.
झाडाला दीडशेवर लिंब
झाडांचे कलम अर्जुन गांजरे यांनी नाशिकहून आणले होते. रासायनिक खतासोबतच त्यांनी सेंद्रिय खताचाही वापर केला. प्रत्येक झाडाला ठिबक सिंचनाद्वारे पाणीपुरवठा केला. योग्य काळजी घेतल्याने पीकांचा चांगली वाढ झाली. लिंबाच्या एका झाडाला दीडशेहून अधिक लिंबे पाहायला मिळतात. गांजरे यांना या शेतीतून वर्षाला दीड लाखांचा नफा होतो.
पाण्याचे नियोजन महत्त्वाचे
उन्हाळ्यात लिंबांना सर्वाधिक मागणी असते. तथापि, या हंगामात फळबाग टिकवण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. कारण उन्हाळ्यात पाणी कुठून आणणार, हा प्रश्न असतो. मात्र, त्यांच्या शेतात पाण्याचा मुबलक प्रमाणात साठा असून, नियोजनही योग्य आहे. त्यामुळे भर उन्हात त्यांची फळबाग बहरली दिसून येते.