पावसासाठी झाडपत्तीचा धूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 23:08 IST2017-08-13T23:07:06+5:302017-08-13T23:08:01+5:30
पावसाने शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकºयांच्या आशा आता मावळू लागल्या आहेत.

पावसासाठी झाडपत्तीचा धूर
नंदकिशोर इंगळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पापळ : पावसाने शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकºयांच्या आशा आता मावळू लागल्या आहेत. मात्र, तरीही बळीराजाने हार मानलेली नाही. नैसर्गिकरित्या पाऊस पडत नसेल तर कृत्रिम पाऊस पाडण्याकरिता अनोखा प्रयोग नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंप्री निपाणी आणि हिवरा (मुरादे) येथील शेतकºयांनी त्यांच्या गावात केला. मीठ, रूईची पाने, उंबराच्या झाडाची पाने, गोंधन, दुधी, राख आणि वाळलेल्या पºहाटीचा धूर त्यांनी आकाशात सोडला.यामुळे एकदा तुरळक पाऊस आला. पण, त्यानंतर पुन्हा हा प्रयोग यशस्वी झाला नाही.
यंदा पावसाने सुरूवातीला थोडकी हजेरी लावली आणि त्यानंतर तो बेपत्ता झाला तो कायमचाच. प्रतीक्षा करून-करून थकलेल्या शेतकºयांनी हवामान खात्यावर भिस्त ठेऊन पेरण्याही करून टाकल्या. पण, वरूणराजा काही बरसला नाही. परिणामी शेतकºयांना कर्जबाजारी होऊन दुबार-तिबार पेरणी करावी लागली.
काहींची पेरणी साधली. ज्यांची पेरणी साधली त्यांची पिके आता अखेरच्या टप्प्यात आहेत. मात्र, मागील २५ दिवसांपासून वरूणराजा रूसल्याने ही पिके वाचविण्याचे आव्हान शेतकºयांसमोर आहे. हलक्या प्रतीच्या जमिनीतील आर्द्रता पूर्णत: नाहीशी झाल्याने पिके वाचविण्याकरिता शेतकरी सैरभैर झाले असून मिळेल ते प्रयोग करीत आहेत. कृत्रिम पावसाच्या या प्रयोगाने पाऊस पडेल आणि पिकांना नवसंजीवनी मिळेल, या आशेने येथील शेतकºयांनी पाऊस पाडण्यासाठी हा प्रयोग केला. पाण्याचे बाष्पीभवन होऊन हवेपेक्षा हलकी झालेली पाण्याची वाफ आकाशात जाते. आकाशात गोळा झालेल्या ढगांमध्ये सिल्व्हर आयोडाईड, पोेटॅशियम आयोडाईड, ड्राय आॅईलचे (सॉलीड कार्बन डाय आॅक्साईड) कंपाऊंड वाफेत मिसळल्यास वाफेची घनता हवेपेक्षा जड होते आणि गारवा निर्माण झाल्याने पाऊस पडतो, असे प्रबोधन ज्युनियर कॉलेजचे रसायनशास्त्र विभागप्रमुख अमोल ढोले म्हणाले.
कृत्रिम पाऊस पाडणारे रडार यंत्र
पिंप्री (निपाणी), हिवरा (मुरादे) येथील शेतकºयांनी वरुणदेवाला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाययोजना केल्यात. धोंडी काढल्यात, सामूहिक धार्मिक कार्यक्रम, जलाभिषेक करून साकडे घालण्यात आले. परंतु पाऊस पडला नाही. शेवटी धुराच्या माध्यमातून पावसाचा प्रयोग करण्यात आला. यातील मीठ व वनस्पतींच्या संयोगातून सोडियम कार्बाईडची निर्मिती होते आणि त्यामुळे पाऊस बरसतो, असा त्यामागील शास्त्रीय तर्क आहे. कृत्रिम पाऊस पाडणाºया रडार यंत्रातही या रासायनिक क्रियेचा वापर करण्यात आला होता, असे गावकºयांचे म्हणणे आहे. आकाशात ढगांची गर्दी नसल्याने याप्रयोगाने गावकºयांची अपेक्षापूर्ती झाली नाही. एकदाच काय तो तुरळक पाऊस पडला. त्यानंतर त्याअनुभवासाठी गावकरी पुन्हा-पुन्हा तो प्रयोग करून पाहात आहेत. याप्रयोगासाठी पुढाकार घेणाºयांमध्ये सरपंच विशाल रिठे, राजीव धार्मिक, शुभम अतकरी, गणेश रिठे, प्रफुल्ल बोथरा, राजीव बोथरा, प्रदीप कुकडे, प्रल्हाद ढगे, पुरुषोत्तम इंगळे यांचा सहभाग होता.
मीठ अर्थात सोडियम क्लोराईड या रासायनिक पदार्थात काही विशिष्ट रासायनिक पदार्थ मिसळून कृत्रिम पाऊस पाडला जातो. पापळच्या प्रयोगात वनस्पतींच्या धुरापासून तसले घटक निर्माण होत असेल तर पाऊस पडण्याची शक्यता आहे, तथापि त्याबाबत प्रयोगशाळेतील निरीक्षणांतीच अचूक बोलता येईल.
- प्रा. अमोल ढोले
रसायनशास्त्र विभागप्रमुख